सकाळी उठताना…

संध्याकाळची ५:४३ ची कल्याण सुपरफास्ट. पण मुलुंडला थांबणारी. नेहा ह्याच गाडीत चढते. त्यामुळे मी सुद्धा ह्याच गाडीत चढतो. दारातच लटकतो. हे माझं बरेच दिवस चालू होतं. आज मात्र मी तिचं घर कुठे आहे हे बघायचं ठरवलं. मुलुंडला तिच्यापाठोपाठ मी सुद्धा उतरलो. ती छोटी छोटी पावलं टाकत निघाली. मागून दिसणारे तिचे जीव गुंतवणारे मोकळे केस. आणि मोगर्‍याचा गजरा… कलेजा अगदी पिघळून जात होता. मुलुंड ईस्टला बाजारातून नेहा पुढे एका छोट्या गल्लीत शिरली. इथे वर्दळ तशी नव्हतीच. संध्याकाळची वेळ. रस्त्यावरचे दिवे असून नसल्यासारखेच होते. मंद झुळुकेबरोबर तरंगत येणारा मोगर्‍याचा सुंदर वास मला बेभान करायला लागला. श्वासाची गती वाढली. कानशीलं तापायला लागली. तेव्हढ्यात तिने मागे बघीतलं.. आणि, आणि आम्ही दोघेही किंचाळलो. ती माझी बायको होती. घड्याळाच्या गजरासारखी ती कोकलत होती. 

मला एकदम जाग आली. सकाळचे साडेपाच वाजले होते.

च्यायला, सकाळच्या शांततेत घड्याळ बेंबीच्या देठापासून किंचाळत होतं. एक तर नेहा अचानक गुल झालेली. त्या ऐवजी बायको कुठल्यातरी शेणकुट गल्लीत पाच फुटांवर उभी. स्वप्नात सुद्धा बायकोचा पिच्छा सुटत नाही? साला, काय फालतू नशीब आहे? असं म्हणत कपाळावर हात मारतात तसा घड्याळावर मी हात मारला. तर डिजिटल अलार्म क्लॉकमधे अचानक रेडिओ मिरची स्टेशन सुरू झालं. “च” आणि “स” नंतर आता “भ” च्या भाषेत माझ्या मुखातून शिव्या बाहेर पडायला लागल्या. व्यासमुनींच्या मुखातून जेव्हढ्या सहजपणे महाभारत बाहेर पडलं तेव्हढ्याच सहजपणे! आधी गजराचं घड्याळ, मग रेडिओ मिरची आणि आता बाजूला घोरत असलेली खरी तिखट मिरची ओरडायला लागली.

ह्या सगळ्या लफड्यात रेडिओ मिरचीने कोकलणं चालूच ठेवलं होतं. सकाळी साडेपाचला त्यावर “बिडी जलाई ले, जिगर में पिया” हे गाणं लागलं होतं. ह्या असल्या बिड्या कोणाच्या बापाने तरी पेटवल्या आहेत का पहाटे? कानाखालीच पेटवावीशी वाटत होती ह्या बाईच्या… बाईच्या म्हणजे गाणारीच्या, शेजारी झोपलेल्या माझ्या बायकोच्या नव्हे!

काय प्रसंग आहे? नेहाऐवजी माझी बायको स्वप्नात दिसली म्हणून मी किंचाळत उठलो आहे, डोळ्यांवर अपरंपार झोप आहे, “भ”च्या भाषेत सक्काळी सक्काळी शिव्या हासडतो आहे, त्याने बायको ओरडत उठली आहे आणि बॅकग्राऊंडला काय? तर म्हणे “बिडी जलाई ले”… सकाळी साडेपाच वाजता. एवढ्या राड्यामधे बिडी वगैरे जळणं राहू दे, पण आमचे शेजारी आमचं घर मात्र नक्की जाळणार. ह्या रेडिओ मिरचीला सुद्धा अगदी काडीचीही किंवा बिडीचीही अक्कल नाही. पहाटेच्या प्रहरी देवाचं नाव घ्यायचं सोडून शिव्या, बीड्या, भांडणं.. नुसता कल्ला चालला होता घरात. मोगं वरती अगदी तळमळत असतील. (मोगं म्हणजे मोरेश्वर गणेश, मी जन्मायच्या आधी स्वर्गवासी झालेले माझे आजोबा.)

माझे डोळे बंदच होते. बंद डोळ्यांनी डिजिटल अलार्म क्लॉकमधे वाजणारी बिडी विझणार कशी? पूर्वीची गजराची घड्याळं चांगली होती. त्याला एकच बटन असायचं. त्याच्यावर हात आपटला की आवाज बंद. बायको ओरडल्यावर माझा आवाज बंद होतो तसा. हल्लीच्या डिजिटल अलार्म क्लॉकला किती बटनं असतात माहीती आहे का? आवाज कमी जास्त करायला, रेडिओ स्टेशनचा बँड बदलायला, घड्याळाचे आणि गजराचे आकडे फिरवायला. आर्यभट उपग्रहाला कंट्रोल करायलासुद्धा एव्हढी बटनं वापरत नसतील.

 ह्या सगळ्या बटनात सर्वात महत्वाचं बटन घड्याळाचं थोबाड बंद करणारं. ते मात्र एकदम मागच्या बाजूला. भर दुपारी उघड्या डोळ्यांना सुद्धा ते सापडणं मुश्किल, मग पहाटेच्या अंधारात मेंदू कचकलेला असताना बंद डोळ्यांनी ते बटन कसं सापडणार? असली घड्याळं बनवणार्‍यांना दोन दिवस मिरचीची धुरी देऊन जागं ठेवायला पाहिजे आणि मग ते झोपले की दर दोन तासांनी रेडिओ मिरची त्यांच्याच घड्याळावर वाजवायला पाहिजे. तेंव्हा साल्यांना खरी अद्दल घडेल.

 पण ह्याच घड्याळाला “स्नूझ” नावाचं वरती अजून एक मोठ्ठं बटन असतं. स्नूझ म्हणजे हलकी झोप. ते बटन जोरात आपटलं की घड्याळ दहा मिनीटं तरी बोंबलायचं थांबतं. शेवटचा प्रयत्न म्हणून परत एकदा शिवी हासडून जोरात घड्याळावर हात आपटला. माझ्या नशीबाने तो स्नूझ वर पडला, आणि बिडीवालीचा आवाज एकदम बंद झाला. हुश्यऽऽ. सगळीकडे अगदी सन्नाटा. खूप बरं वाटलं.  डोळ्यांवर झोप अनावर होत होती.                

पण स्नूझमधे म्हणे दोन्ही मेंदू थोडे जागेच असतात. आता अंधारात अचानक डोळ्यांसमोरचा देखावाच बदलला. सुंदर मोठी बेडरुम, रेशमाचे नक्षीदार पडदे, कोपर्‍यात मंद पणत्या. मधोमध भव्य पलंग. त्यात एका बाजूला छान सुंदरी बसलेली होती. तीने कॉटनचा मऊ मऊ चुणीदार घातला होता. माझं डोकं तीच्या मांडीवर ठेवून मी पहूडलेलो होतो. व्यवस्थित रेशमी सुरवार-झब्बा घालून. ह्या वयात म्हणे दिगंबरावस्थेतली “तसली” स्वप्न पडत नाहीत. पलंगावरसुद्धा सगळेजण सत्यनारायणाच्या पूजेला घालतात तसे कपडे घालून अघळ-पघळ पडलेले असतात. ती सुंदरी शेजारच्या चांदीच्या ताटातून मला एकेक द्राक्षं भरवत होती. माहौल बघून मी सुद्धा ती द्राक्षं वचावचा खात नव्हतो. ओठ दुडपून हळूच रिचवत होतो.

पायापाशी दुसरी तरुणी तिच्या लाल नाजूक नखांनी माझ्या तळपायाला गुदगुल्या करत होती. अहाहाऽऽ, क्या बात है? गुदगुल्यांची शिरशिरी वार्‍याच्या झुळुकीसारखी अलगदपणे सबंध अंगभर पसरत होती. खोलीभर केवड्याच्या उदबत्तीचा वास दरवळत होता. गुलाम अलीच्या गझलेने वातावरण भरून गेलं होती. सगळी पंचेंद्रिय एकरूप झाली होती. नाकाने वास घेतो आहे की गझल हुंगतो आहे काही काही कळत नव्ह्तं. पलीकडच्या खोलीत तिसरी तरूणी बासुंदी आटवत होती. ह्या स्वप्नात तिन्ही तरूणींचं एकदम माझ्या बायकोत रूपांतर होणार नाही ह्याची खात्री माझ्या मेंदूला झाली होती. त्यामुळे लाजरं, मिश्कील हास्य माझ्या ओठांवरून रांगत जात होतं. कहर, अगदी कहर चालू होता.

काय नशीबाची थट्टा आहे बघा. नुसत्या “गुदगुल्या”त आयुष्य कहर वाटायला लागलं आहे आजकाल. चालायचंच. पन्नाशीत पोहोचल्यावर स्वप्नांशी स्वप्नांतच वाटाघाटी करता येत नाहीत आणि स्वप्नात नविन आणखी स्वप्न बघता येत नाहीत. उदाहरणार्थ मला रेशमी सुरवारीच्या पेहेरावाऐवजी नुसत्या आतल्या चड्डीत लवंडू दे, किंवा सुटलेल्या पोटाऐवजी सिक्स-पॅक दिसू दे अशा ईच्छा आपण स्वप्नात दामटवू शकत नाही. त्यातून लहान मुलांसारखे पाय आपटून मी हावरटपणा करायला गेलो असतो आणि स्वप्नच गुल झालं असतं तर? द्राक्षं आणि बासुंदी तर बाजुलाच राहू द्या, मुगाची खिचडी खायला लागली असती. (मुगाची खिचडी हा माणुसकीला लागलेला काळीमा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे माझं मत बायकोला माहित आहे. त्यामुळे ती माझ्यावर जेंव्हा सरकलेली असते तेंव्हा संध्याकाळी हळूच पुडी सोडते, “अय्या, आज आपण मुगाची खिचडी खाऊ या का?” माझ्या मनात येतं, “अय्या, मी संडासाच्या पॉटमधे उडी मारून जीव देऊ का?” पण असं मी म्हणत नाही. ते फक्त मनातच येतं. मी मोठ्या आवाजात उत्तर देतो, “होऽऽऽ”.) त्यामुळे मी आहे त्यात समाधान मानून स्वप्नांची गम्मत मुकाट्याने चाखायची ठरवली.

तेवढ्यात त्या तिसर्‍या तरूणीच्या हातातून बासुंदीचं भांडं सटकलं, आणि ती किंचाळायला लागली. गजराच्या घड्याळासारखी. पाच-सहाच द्राक्षं खाऊन झालेली होती. गुलाम अलींची “थोडीसी जो पी ली है” गझल थोडीशीच संपलेली होती. तेव्ह्ढ्यात झोप उडालीच. परत ये रे माझ्या मागल्या. तोच नशीबाला दोष, रानटी शिव्या, “तो बोंबल्या बंद कर आधी” असं माझ्यावर ओरडणारी बायको. डोळे किलकिलत शेवटी घड्याळाच्या मागच्या पॄष्ठ्भागावरती चापट मारून एकदाचा तो आवाज मी बंद केला. आता उठणं भागंच होतं. साडेसात वाजता कोरीयाच्या कस्टमरचा फोन होता. त्याला मोटारीचे काही सुटे भाग विकायचा आम्ही प्रयत्न करणार होतो. त्याआधी ऑफिसात पोहोचायलाच हवं होतं.

उठून बसल्यावरती हात आपोआप जोडले गेले कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला. खरं तरं ह्यावेळी लक्ष्मी, सरस्वती वगैरे देवींनी मस्तपैकी ताणून दिलेली असणार. सकाळी साडेपाच वाजता तडमडत माझ्या हातावर कशाला येऊन बसतील त्या? मी बंद डोळ्यांनी म्हणालो,

कराग्रे वसते झोप ।
कर मधे सुद्धा झोप ॥
करमुले तर झोपच झोप ।
प्रभाते झोप दर्शनम॥

आता ह्या “स्नूझ”च्या झोपेत दोन्ही मेंदू संगनमताने काम करायला लागले होते. मनात नविन नविन विचार यायला लागले, “समजा, मी सकाळी संडासला गेलोच नाही तर?” थोडीशी कळ काढायला लागेल. पण दहा मिनीटं तरी वाचतील. ऑफीसमधेच नंबर दोनला जाऊ.” कल्पना झकास होती. त्यामुळे अशाच आणखी वेळा वाचवायच्या संध्या शोधण्यासाठी  मग दोन्ही मेंदू पेटले. छोटया मेंदूला आठवलं की स्वप्नात मी द्राक्षं खात होतो. लगेच त्याने किडा सोडला, “आज ब्रेकफास्ट कशाला हवा? दुपारचं जेवण ऑफिसमधेच जरा लवकर करू. सकाळी चहा घेतोच तिकडे फुकटातला. तो एका ऐवजी दोन कप पिऊ. अजून पंधरा मिनीटं वाचतील.” ह्या २५ मिनीटात द्राक्षाचा अख्खा घड, २-४ बासुंदीच्या वाट्या, गझला, हव्या आणि नको त्या ठिकाणी गुदगुल्या असं बरंच काही साध्य करता आलं असतं.            

तेव्ह्ढ्यात मोठ्या मेंदूला काहीतरी आठवलं. मुलीला पण शाळेत जायचयं आणि बायकोला पण ऑफिसला जायचयं. मला २५ मिनीटं उशीर म्हणजे म्हणजे सगळ्यांनाच खोळंबा. मनाचा जळफळाट झाला. विचार आला, वाल्याकोळी सारखा मीच का त्याग सहन करायचा? घरातलं दुसरं कोणी का नाही माझ्या आधी उठू शकणार? सर्वात आधी मीच उठायचं, पैसे पण मीच मिळवायचे, ऑफिसमधे शिव्या पण मीच खायच्या. काय चाललयं काय? माझा पुरुषार्थ जागा झाला… मी नाही जागा झालो. मी झोपलेलोच. पुरुषार्थ जागा व्हायला पुरुषाला जागं व्हायला लागत नाही हे किती बरं आहे. मी माझ्या बाजूला झोपलेल्या घोरणार्‍या बायकोला म्हणालो,

मी:   ए, उठ ना. तुझं आधी आवर ना.

बायको: काय आहे? (हिडिस फिडिस करणार्‍या आवाजात बायको गरजली)

मी:   मला खूऽऽऽप झोप येतेय. तू आधी आवरशील का? मी खूप उशीरा झोपलो. मला थोडं उशीरा ऑफिसमधे गेलं तरी चालेल. (दिली एक थाप ठो़कून!)

बायको: पण आपलं ठरलेलं होतं ना की तू रोज सकाळी आधी उठायचं म्हणून. (आपलं म्हणजे तिचं ठरलं होतं!)

मी:   प्लीऽऽऽज. मी खूप दमलोय गं. (गरजवंतांनी भांडणं करू नयेत.)

बायको: पण संध्याकाळी तू घर आवरायचं. (मी कपडे धुतले असते, भांडी घासली असती, स्वैपाक केला असता, तीचे पाय सुद्धा चेपले असते. पण वाटाघाटीत आपला फायदा होत असेल तर शत्रूपक्षाला कळता कामा नये, नाहीतर पुढच्या वेळी त्याचा तोटा होतो.)

चला, स्वप्नात आता पंचवीस मिनीटंच उरली होती. बासुंदीवालीला सांगितलं की बाई गं, शेगडीची धग वाढव. पातेल्यात एक भांडं उलटं टाक म्हणजे बासुंदी खालून करपणार नाही आणि ओतू जाणार नाही. गुदगुलीवालीला सांगितलं की तळपायाला गुदगुल्या खूप झाल्या. पेन्सिलीच्या टोकाने पायाच्या बोटांच्या तळाशी आणि कानाच्या मागच्या बाजूला अगदी हळूच गुदगुल्या कर. त्याने माझ्या टकलावर सुद्धा काटा येतो. द्राक्षवालीला सांगितलं की इकडे तिकडे बघत एकेक द्राक्षं माझ्यासमोर नाचवू नकोस. कामाकडे लक्ष दे आणि दोन दोन द्राक्षं माझ्या घशाखाली उतरव. अचानक सगळीकडे घाई सुरु झाली. मधेच बासुंदीवाली माझ्या बायकोच्या आवाजात म्हणाली, “झालं माझं. उठ आता.” मी माझं लक्ष बासुंदीकडे वळवलं. रबडी सारखी केशरयुक्त गरम गरम बासुंदी काय लागते म्हणून सांगू? जरा नंबर दोनची कळ काढायला लागते. पण बासुंदीच्या चवीपुढे ह्या प्रेशरला कोण विचारतो? सॉलीड धमाल येत होती.

तेवढ्यात गुलाम अलींच्या गझलांची सीडी संपली म्हणून डोळे उघडून बघितलं तर मला समोर घड्याळच दिसलं. परत एकदा खाडकन् झोप उडाली. पंचवीसच्या ऐवजी ४५ मिनीटं मी स्वप्नातच होतो. बायको “झालं माझं. उठ आता.” असं म्हणून निघून गेलेली असणार. स्वप्नात मजा केली. आता मात्र धावधाव होणार.

जाळ्यातल्या मासळीसारखी पलंगातच टुणकन् उडी मारली. हात जोडले. कराग्रे कोरीयन लक्ष्मी दिसायला लागली. कर मधे बॉस खुन्नस खात हजमोला खाल्ल्यासारखा चेहरा करून उभा होता. कर मुले मी ऑफिसात उशीरा पोहोचल्याने सगळे सहकारी फिदीफिदी हसत होते. मी पटकन उभा राहिलो. आणि पहिलं पाऊल टाकतानाच माझा गुडघा दाणकन् शेजारच्या टेबलाला आदळला. “आई गंऽऽ” मी जोरात विव्हळलो. ह्या क्षणाला डोक्यातून अशी रागाची सणक गेली म्हणून सांगू! त्याला कारणही तसंच होतं.

जगातल्या प्रत्येक पलंगाला दोन बाजू असतात. एक अडगळीची बाजू आणि दुसरी मोकळी बाजू. मोकळ्या बाजूला बाथरूम असते. अडगळीच्या बाजूला टेबल, खुर्ची, सामानाची पेटी, खिडकी, मुलांची अभ्यासाची पुस्तकं, धुण्याचे कपडे अशा गोष्टी पसरलेल्या असतात. नविन पलंग आणला तेंव्हा पहिल्या दिवशीच बेडकाच्या चपळाईने बायको पलंगाच्या मोकळ्या बाजूला पटकन् उडी मारून बसली. मला एकदम श्रीकृष्णाच्या पलंगावर दुर्योधनाशी वाटाघाटी करतो आहोत असं वाटायला लागलं.

मी: असं काय गं? इतकी वर्षं तू ह्या साईड्ला झोपलीस ना. आता माझी टर्न.

बायको: नाही, मीच झोपणार.

मी: अगं, दिवसेंदिवस माझा प्रोस्ट्रेट मोठा होत जाणार. इतर पुरुषांप्रमाणे मला सुद्धा सारखं बाथरूमला जावं लागणार.

बायको: त्या बाजूने जा.

मी: पण अडगळीमधून पलीकडच्या बाजूने जाताना उशीर झाला आणि वाटेतच झाली तर?

बायको: शीऽऽ, काय पाचकळ बोलतोस. तसं काहीही होणार नाही. काही का असेना, मी इथेच झोपणार.

 स्वतः श्रीकॄष्ण हजर नसल्याने ह्या वाटाघाटीत अर्जुनाचा बोर्‍या वाजणार होताच. मी शेवटी हरलो. रोज सकाळी अडथळ्याची शर्यत पार करायला लागलो. पण आज घाईघाईत गुडघा टेबलाला आपटला होता. त्यातून स्वप्नातल्या खोट्या बासुंदीचं खरं प्रेशर मला बाथरूम पर्यंत पोहोचायच्या आधीच जाणवायला लागलं. अगदी निश्चय केला होता की काहीही झालं तरी घरी नंबर दोनला जायचं नाही. पाय क्रॉस टाकत तग धरायचा. त्यामुळे फॅशन शो मधल्या बायकांसारखं एकासमोर एक पावलं टाकत बाथरूमच्या दिशेने जायला सुरुवात केली. लेंगा-पायजमा घातलेला हा टकल्या पॅरीसच्या फॅशन-शो मधे रॅम्प वर अवतरल्यासारखा बाथरूममधे अवतरला. तेथे श्रीकृष्ण बासरी वाजवतो त्या पोजमधे मी दात घासायला सुरुवात केली. अगदी पाय क्रॉस करून. कटाक्षाने काहीही झालं तरी संडासाच्या पॉटकडे बघायचं नाही असा माझा प्रयत्न होता. 

ते झाल्यावर पुढे आंघोळीतसुद्धा मुरलीधर बासरी वाजवत उभाच. प्रेशर आता कमी होईल, नंतर कमी होईल ह्याची वाट बघत. अशा पोजमधे एकवेळ अंगावर पाणी घेता येईल. पण साबण कसा लावणार? पुढचं पुढे बघू असं म्हणून तशातच शॉवर चालू केला. आणि अंगावर आला थंड पाण्याचा फवारा. मग माझ्या मुखातून आला नेहमीच्या शिव्यांचा फवारा. पण बॉईलरमधलं गरम पाणी शॉवरमधे येईपर्यंत थोडा वेळ लागणारच. तोपर्यंत अंगाला गार पाणी लागू नये ह्याची केविलवाणी धडपड चालू झाली मुरलीधराची. त्या एवढ्याशा बाथरूममधे हा श्रीकॄष्ण पालीसारखा भिंतीला चिटकून उभा… बासरी वाजवायच्या पोजमधे. शेवटी एकदाचं गरम पाणी शॉवरला यायला लागलं तेंव्हा मी हे मुरली-ताडासन सोडू शकलो. मग हळूच पाण्यात देह सरकवला. खरं तर मला खूऽऽप वेळ अतिशय गरम पाण्याखाली उभं राहायला आवडतं. पाण्याची वाफ साठून त्या धुक्यात आपल्या पोटाचा नगारा दिसेनासा झाला की मग साबण लावायचा ही माझी पद्धत. पण आज उशीर झाला असल्याने लगेच साबण शोधायला लागलो. आता बाथरूममधली साबणाची वडी गायब झाली होती. माझ्या नशिबाचं काही खरं नव्हतं.               

नविन साबणाची वडी होती बेडरूमच्या फडताळात. बाथरूममधे एवढी जागाच नव्हती. शेवटी ओल्या अंगाने हळूच बेडरूमचं दार बंद करून दिगंबरावस्थेत साहेब निघाले साबण शोधायला. आपल्याच घरात मांजरीच्या पावलाने दबकत दबकत कोणी आत येणार नाही ह्याच्याकडे लक्ष देत. कमरेभोवती टॉवेल गुंडाळायचं सुद्धा मला भान नव्हतं. एकतर पायाखालची फरशी अंगाचं पाणी सांडून सगळी निसरडी होत होती आणि आपल्याच घरात आपण चोरासारखे वावरत आहोत असं उगाच वाटत होतं. काहीका असेना, महत्त्वाचं म्हणजे साबण सापडला. कोलंबसाला जणू अमेरिका सापडली. बैलाने रस्त्याच्या मधोमध नंबर एक उरकल्यावर त्याचं अंग कसं शहारतं, तसं माझं ओलं अंग थंडीत आनंदाने शहारलं. तेही नंबर एक न करता.. 

सगळीकडे ओली चैथळ करून मुरलिधर परत शॉवरखाली पोहोचले. पण एवढ्या काळात मेंदू आणि डोळे साबण शोधण्यात गुंतलेले असले तरी मोठं आतडं अगदी कार्यक्षमतेने आपलं काम करत होतं प्रेशर वाढवण्याचं.

एव्हढा वेळ कसाबसा तग धरला होत. किती वेळ वरती खेचून धरणार? शेवटी अगदी राहवेना. अशाच ओल्या अंगाने परत शॉवरमधून बाहेर येऊन नंबर दोनसाठी स्थानापन्न झालो. बसलो सिंहासनावर बादशाह अकबरासारखा. अहाहाऽऽ, काय सुख आहे. सुटलो एकदाचा. सुखाच्या वेदना किती गोड असतात नाही? सुखाच्या लाटांवर लाटा अंगावर.. नाही.. पोटावर येत होत्या. काही क्षणांपुरतं मी द्राक्षं, गजरा, गुदगुल्या सगळं सगळं विसरलो होतो. ह्यालाच मोक्ष असं म्हणत असतील का? रंगीबेरंगी सूर्य फक्त माझ्यासाठीच उगवला आहे ह्याची मला खात्री पटायला लागली. अख्ख्या कोरियामधे फक्त माझीच कंपनी मोटारींचे भाग विकते आहे असं मला वाटायला लागलं. माझं डबल प्रोमोशन होउन माझ्या बॉसचा मी बॉस झालो आहे अशी गोड कल्पना मला स्पर्श करून गेली. सगळं आवरल्यानंतर जेंव्हा मी आरशासमोर उभा राहिलो तेंव्हा माझ्याऐवजी मला जॉन अब्राहॅम दिसायला लागला. त्यामुळे मी चक्क दाढीला पण दांडी मारली. माझं रक्त सळसळायला लागलं. आणि जागेपणी पुरूषार्थ जागा झाला की कसं वाटतं ह्याचा जिवंत अनुभव मी घ्यायला लागलो.

नंतरचं आवरायला मला वेळ लागला नाही. ऑफिसात मी उड्या मारत पोहोचलो तेंव्हा खरं तर उशीर झाला होता. पण फोनवरती त्या कोरियन कस्टमरला मी मोटारीच्या प्रत्येक भागाबरोबर एक मोगर्‍याचा गजरा फुकट द्यायची ऑफर दिली, आणि त्याने तो सौदा खुशीत स्विकारला.

हल्ली मी माझ्या कंपनीचा राजिनामा देऊन मोगर्‍याचे गजरे, बासुंदी आणि द्राक्षं ह्यांची एक्सपोर्ट एजन्सी सुरू केली आहे. 

नितीन अंतुरकर, मार्च, २००९

बाबांचा मुलगा

कुलकर्णी सर मस्त गोष्ट सांगतात. वर्गातली दादागिरी करणारी मुलं सुद्धा त्यांच्या  गोष्टी चुपचाप ऐकतात. आज तर त्यांनी माझ्या आवडीची श्रावणबाळाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. श्रावणाने पाण्याचं भांडं तळ्यात बुडवलं तेंव्हा तर माझ्या अंगावर काटाच आला. माझ्यासारखी त्याने अंधारात मोठ्याने रामरक्षा म्हणायला हवी होती. मग दशरथाने बाण नसता मारला. त्याला तरी प्राण्यांना मारण्याची काय हौस? माझ्या डोळ्यात पाणीच आलं रागाने. कोणाला दिसलं असतं तर सगळ्यांनी मला “मुलगी”, “मुलगी” म्हणून चिडवलं असतं. पट्कन पुसून टाकलं.

मी आई-बाबांना कधीच अंधारात श्रावणबाळासारखं एकटं सोडणार नाही.

वर्गात नंतर मजाच झाली. सर म्हणाले की हीच गोष्ट आता मी कवितेत गाणार आहे.

शर आला तो धावून आला काळ ।
विव्हळला श्रावणबाळ ॥

काय रडकी कविता आहे! पण बाजूचा दांडेकर मात्र मान खाली घालून फुसुफुसु हसत होता. मी त्याच्याकडे बघितलं तर त्याने मला हळूच त्याची वही दाखवली. त्यात लिहिलं होतं,

शरू आली तो धावून आले काळे । ।
विव्हळले बाळे बाळे ॥ ॥

शरू जांभेकरच्या मागे काळे सर शाळाभर धावताहेत. काय कल्पना होती! मला तर एवढं हसू आलं की नाकातून शेंबूडच आला. शर्टाला पुसेपर्यंत सरांना कळलंच.

सर म्हणाले, “जोशीसाहेब, उभे राहा. काय झालं हसायला? श्रावणातल्या तेराव्याला तुम्हाला लाडू खायला बोलावलं आहे वाटतं?” मी मान खाली घालून आतल्या आत हसतच होतो. सर अजूनच भडकले. म्हणाले कसे, “वडील हॉस्पिटलमधे, आणि हे हसताहेत. आता तरी शिका जरा जबाबदारी.” सरांना असं का वाटतं की मला बाबांची काळजीच नाही. मी मान वर करून म्हणालो, “बाबा होणारच आहेत बरे माझे. रोज गणपतीची आरती म्हणतो मी.” त्यावर सर गरजले, “एवढं कळतं तर वर्गात का हसता आहात फिदीफिदी. शिकण्याकडे लक्ष द्या नाहीतर याल उद्या रस्त्यावर.”

हो, आम्ही गरीब आहोत. पण रस्त्यावर नाही येणार. माझी आई म्हणते, “घरोघरी पोळ्या करून पैसे कमवीन. पण मुलांचं शिक्षण पूर्ण करीन.” मी पण आईला म्हणतो की “मी चहा आणि तेल विकीन घरोघरी. खूप अभ्यास करीन. बाबांना चांगल्या हॉस्पिटलमधे घेऊन जाईन. त्यांना लवकर बरं करीन.” असं म्हणताना मला उगाच खूप रडू येतं. मग आई पण रडायला लागते. आजी आणि कुंदा पण रडायला लागतात. मग मला माझ्या मुळुमुळु रडण्याचा खूप राग येतो. आजी म्हणते, “वरूण घरातला खंदा पुरुष आहे.” मला खंदा म्हणजे काय ते नक्की कळत नाही. पण आजी असं म्हणाली की खूप बरं वाटतं.

काल मात्र आई आणि आजी जरा जास्तच रडत होते. आजी सारखं हेच म्हणत होती, “कसं होणार माझ्या गोपाळचं (गोपाळ म्हणजे माझे बाबा). घेऊन जा रे मला म्हातारीला वरती. पण माझ्या गोपाळाला वाचव रे.” मामा रात्री बाबांच्यापाशी हॉस्पिटलमधे झोपायला येतो. तो आला तेंव्हा म्हणाला, “काही काळजी करू नका काकू. सगळं छान होईल.” मामाचे धीराचे शब्द ऐकले की सगळ्यांना बरं वाटतं. मला पण पावसात भिजल्यासारखं छान वाटतं. मामा गोड हसतो आणि पक्ष्यांचे छान छान आवाज काढतो. मग आईला सुद्धा हसू येतं.           

मी आणि आजी बाहेरच्या खोलीत झोपतो. कुंदा आणि आई आतल्या खोलीत झोपतात. काल मी रात्री आजीला विचारलं, “राजू म्हणाला की तुझ्या बाबांना कर्करोग झाला आहे. हो का गं आजी?” आजी म्हणाली, “नाही रे बाळा. उद्या परत ऑपरेशन करणार आहेत. मग परत दोन दिवस बेशुद्धी, परत रक्ताच्या बाटल्या. नशीबाचे फेरे असतात बाबा एकेक. तू लवकर मोठा हो आणि कुंदाची, तुझ्या आईची काळजी घे.” आजीच्या डोळ्यातून बाहेरच्या पावसासारखी नुसती धार लागली होती.

आज आई दिवसभर बाबांपाशीच होती. ऑपरेशन सुखरूप पार पडलं होतं. पण काळजी होतीच. संध्याकाळी मी आणि आजी बाबांना बघायला हॉस्पिटलमधे गेलो. काय भयंकर ठिकाण आहे? पावसामुळे आधीच सगळीकडे चिखल झालेला. त्यातून हॉस्पिटलमधली घाण. आमच्या बालभारतीच्या पुस्तकात महात्मा गांधी म्हणतात, “देवाला स्वच्छ ठिकाणी राहायला आवडतं.” मग ह्या हॉस्पिटलमधे कसा येणार तो देव? आणि इथे तर त्याची सर्वात जास्त गरज. मला बाबांची खूपच काळजी वाटायला लागली. देवाच्या मदतीशिवाय ते कसे बरे होणार? मी आजीला विचारलं, “बाबांना घरी घेऊन जाऊ या का? इथे खूप घाण आहे.” आजी म्हणाली, “तिकडे इंजेक्शन कोण देणार? रक्ताच्या बाटल्या कुठून आणणार? ऑपरेशनची साधन कुठे आहेत आपल्या घरी?”    

बाबांच्या जनरल वॉर्डमधे शिरलो तर माझ्या अंगावर शिरशिरीच आली. सगळीकडे खाटा टाकलेल्या. त्यावर झोपलेली माणसं कधी खोकत होती तर कधी ओरडत होती. प्रत्येकाच्या बाजूला एक पाण्याची बाटली लटकवलेली होती. आणि सगळ्यांचे डोळे… प्रत्येकाच्या डोळ्यात खूप दु:ख होतं काळ्या ढगासारखं. त्या ढगाच्या सावल्या भेटायला आलेल्या लोकांच्या डोळ्यात पडल्या होत्या. पण नर्स.. त्यांच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते.

इतका वेळ मला आई दिसलीच नव्हती. ती पलीकडच्या खाटेच्या बाजूला बसली होती. मी तिला बघितलं आणि विचारलं, “बाबा कुठे आहेत?” तीने खाटेकडे बोट दाखवलं. माझा विश्वासच बसला नाही. त्यांच्या चेहर्‍यावर एक प्लॅस्टीकचा मुखवटा घातला होता. डोळे मिटलेले. चेहर्‍यावर सगळीकडे सुकलेलं काळं निळं रक्त. घसा उघडाच. त्यात काहीतरी घालून ठेवलेलं. घशाच्या खाली एक पट्टी लावलेली. अंगावर घाणेरडी राखाडी चादर. वरती एका बाजूला पाण्याची आणि दुसर्‍या बाजूला रक्ताची बाटली. त्यातून निघालेल्या नळ्या चादरीखाली बाबांच्या हाताला लावलेल्या.

माझ्या पोटात डुचमळायला लागलं. आणि… आणि खूप मोठ्याने रडू येणार असं वाटायला लागलं. मी धावत जाऊन आईच्या पोटाला मिठी मारली आणि हुंदके द्यायला सुरुवात केली. आईने माझ्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. अगदी बाबा फिरवतात तशी. एक टपकन थेंब पडला माझ्या कानावर. थोड्या वेळाने ती म्हणाली, “वरूणा, धीर धर. आपल्याला बाबांची काळजी घ्यायची आहे ना! मग रडून कसं चालेल?” आजी म्हणाली, “डॉक्टर काय म्हणाले?” त्यावर आई म्हणाली, “काय म्हणणार? घशातला उरलेला गोळा काढलायं. टेस्ट करतो म्हणाले. आज रात्रभर लक्ष ठेवायला सांगितलयं.” थोड्या वेळाने मी आणि आजी निघालो. आई म्हणाली, “वसंता (म्हणजे माझा मामा) इथे आला की येते मी घरी.”

घरी आलो तर मामाकडून ठाण्याहून निरोप आला होत की मामाला अचानक ताप आला आहे. तो आज येऊ शकणार नाही. आजी म्हणाली, “अरे देवा, आता हिला रात्रभर राहायला लागणार हॉस्पिटलमधे. वरूणा, मी जेवायला करते.  तू घरातला खंदा पुरुष आहेस ना. हॉस्पिटलमधे जा, आणि आईला पाठव जेवायला. ती परत हॉस्पिटलमधे आली की तू ये घरी. तूला उद्या शाळा आहे ना.” मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. मी आजीला म्हणालो, “काही काळजी करू नकोस आजी. सगळं ठीक होईल.” कुंदा लागली रडायला आई पाहिजे म्हणून. तीला मी रागावून सांगितलं की “तू आता पाच वर्षाची घोडी झाली आहेस. रडणं बंद. अगदी चूप बैस. सारखी मुळुमुळु रडत असते ती.” माझी सगळी भीती कुठेतरी निघून गेली होती.

मी पटपट जेवलो आणि हॉस्पिटलमधे पोहोचलो. मी आईला सांगितलं “मामाला ताप आला आहे. तो येणार नाही आज. रात्री तूच थांब. पण आता घरी जाऊन जेवून ये. कुंदाला झोपव आणि मग ये. मी तो पर्यंत इथेच थांबतो, आणि बाबांकडे बघतो.” आईला काही ते पटत नव्हतं. ती म्हणत होती, “नाही रे बाबा नाही. मी एकदा जेवले नाही तर माझी हाडं काही स्मशानात जाणार नाहीत. तू जा घरी.” मी परत मोठ्या माणसासारखा म्हणालो, ” आई, असं करू नकोस. घरी जा. जेव. कुंदा रडत होती. आजीला पण तू घरी गेलीस तर बरं वाटेल. मी खंदा पुरुष आहे. मी इथे थांबतो.” शेवटी आई एकदाची तयार झाली. म्हणाली, “मी आलेच तासाभरात.”

रात्रीचे दहा वाजले होते. हॉस्पिटलवाल्यांनी दिवे बारीक केले होते. कुठून तरी एक नर्स आली आणि मला म्हणाली,

“ए मुला, कोन तू?” मी छाती फुगवून म्हणालो,

“मी बाबांचा मुलगा. वरूण गोपाळ जोशी.”

“कोंचा बाबा?”

“माझे बाबा इथे झोपलेत.”

“इथली बाय कुटं हाय?”

“आई घरी गेली आहे जेवायला. येईल तासाभरात. तोपर्यंत मी बाबांची काळजी घेणार आहे.”

“एकदम हुशार दिसतो जनू. कितवीत हायसा?”

“मी आहे सहावीत.”

“बाबाचा पोर्‍या हायेस ना. मग ऐक. झोपू नगस. मी फिरतीवर हाय. काय बी लागला तर मला बोलीव तिकडून.”

“हो”

मी खुर्चीत बसलो. थोडीशी भीती वाटत होती. पण सगळीकडे शांत होतं. रक्ताच्या बाटलीतून थेंबे थेंबे रक्त बाबांच्या शरीरात जात होतं. शंकराच्या पिंडावर पाणी पडतं तसं. मला मळमळल्यासारखं झालं. मी मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरूवात केली.          

किती वेळ झाला कुणास ठाऊक. पण.. पण अचानक बाबांचं शरीर हलायला लागलं. उघड्या घशातून बाबा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. पण फक्त गुडूगुडू आवाजच येत होता, गुळण्या केल्यासारखा. मी धाडकन उठलो. बाबांच्या तोंडापाशी कान नेला. मला काहीच सुधरेना. तेव्हढ्यात बाबांचे हातपाय जोरात हालायला लागले. डोकं गदागदा हलू लागलं. मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं. सगळे झोपलेले. नर्स कुठेच नव्हती. मी जोरात ओरडलो,

“धावा धावा. इकडे या. माझे बाबा बघा कसे करताहेत.”

मी धावत धावत दुसर्‍या वॉर्डापाशी गेलो. तिथेसुद्धा कोणी नव्हतं. धावत धावत बाबांपाशी परत आलो.

आता तर त्यांचं अख्खं शरीर उडत होतं. डोळे पण सताड उघडले होते. हातपाय वेडेवाकडे हलायला लागले. घशातूना आवाज येतच होता. बाबांना काहीतरी होतयं. मला काहीतरी करायलाच हवं होतं. पण काय करू? परत नर्सला हाक मारली. कोणी म्हणजे कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हतं. मी मग बाबांनाच हाक मारायला सुरूवात केली. पण त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. काय करू? काय करू? आई गं, कुठे आहेस तू?

तेव्हढ्यात बाबांच्या जोरात हात हलवण्याने दोन्ही बाटल्या धाड्कन जमिनीवर पडल्या. जमिनीवर सगळीकडे रक्त पसरलं. मी धडपडत परत बाटल्या खाटेला अडकवल्या. पाण्याची बाटली भरलेलीच होती. पण रक्ताची बाटली पूर्ण रीकामी झाली होती. बाबांना रक्त लागणार. काय करू? कुठून आणू रक्त?

मग आठवलं. म्हात्रे सर म्हणाले होते की नाडीत रक्ताचा प्रवाह सर्वात जोरात असतो. समोर मोसंबी कापायचा चाकू होता. मी जोरात माझी नाडी कापली. खूप झोंबलं. भळाभळा रक्त वाहायला लागलं. पण मला खूप बरं वाटत होतं. बाटलीच्या भोकावर मी माझा हात धरला. माझं रक्त बाबांच्या त्या बाटलीच्या आत ओघळू लागलं. बाबांची वेडीवाकडी हालचाल आता थांबली होती. मला झोप यायला लागली. मला खूप बरं वाटत होतं. मला खूप बरं वाटतं होतं. कुळकर्णी सर स्वप्नात म्हणत होते,                                

शर आला तो धावून आला काळ ।
विव्हळला श्रावणबाळ ॥

मी मात्र माझ्या बाबांपाशीच होतो.      

नितीन रा. अंतुरकर, एप्रिल, २००९

ती आणि मी: एक गोष्ट

ती आगन्तुकासारखी माझ्या आयुष्यात अशीच एके दिवशी आली. वाऱ्याच्या झुळूकेसारखी. नकळत, चोरट्या  पावलांनी. माझं लक्ष नसताना!

मी उंच खुर्चीवर पायांना झोके देत बसलो होतो. शाळेतल्या जुन्या आठवणींचा दरवळणारा सुगंध घरात सगळीकडे पसरला होता. वर्गात जसा सुंदर मुलींकडे चोरट्या नजरेने बघायचो तसा ह्या आठवणींकडे सुद्धा मी हळूच वळून वळून बघत होतो. मनाला मोरपिशी गुदगुल्या होत होत्या. ती गौरी… काय गोरीपान होती? लालभडक ओठ. अगदी लखनवी पान खाल्यासारखे. लांबलचक सुंदर केस. त्यातून हळूच तिच्या कानातले डूल दिसायचे आणि माझं हृदय डूचमळायला लागायचं. आणि ती, किनऱ्या आवाजाची जान्हवी. कलेजा साला खलास व्हायचा! असं वाटायचं, असं वाटायचं की तिच्यावरून नजरच ढळू नये. तो वर्ग, ते दिवस, तो काळ संपूच नयेत. पण आठवणींचेच झोके ते! माझ्या हलणाऱ्या पायांच्या झोक्यांसारखेच डोलत होते, नुसतेच तरंगत होते.

तेव्हढ्यात ती मला अचानक दिसली. माझ्या सोफ्याजवळ घरातच अगदी खाली मान घालून उभी होती. लाजरी, बावरी ती!! एका पावलावर दुसरं पाउल ठेऊन ती कसला विचार करत होती कुणास ठाऊक? होती काळी सावळी. पण डोळे विलक्षण तीक्ष्ण होते. तिच्या कमनीय बांध्यावर काळ्या रंगाचा ड्रेस आणि पिवळा चुणीदार तिला फारच शोभून दिसत होता. बोटात बोटं गुंतवून ती जमिनीचा वेध घेत होती. मला कळेचना. ही इथे कशी? कोण घेऊन आलं तिला? दरवाजा उघडा होता की काय? मी तिला विचारलं, “काय गं, तू इथे कशी?” ती काहीच बोलेना. एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे मी हळू हळू तिच्या जवळ गेलो. माझा श्वासोच्छवास वाढायला लागला. मी माझ्या नकळत अलगद तिच्या पाठीवर हात ठेवला. मला काहीच कळेना. मी त्या एकट्या जीवाला धीर देतो आहे की माझ्यातला पुरुष मला तिच्याज वळ खेचत आहे. मन सैरभैर झालं. क्षणभर वाटलं, तिचा हात हातात धरून आकाशात उंच झोका घ्यावा. सगळं जग मागे सोडावं. पण मग तेव्हढ्यातच असंही मनात आलं, की तिला काय वाटेल. ती एकटीच होती ह्या जगात. असा तिचा गैरफायदा घेणं योग्य आहे का? आणि अचानक… मला अंजलीची आठवण झाली, आणि मनात धस्सं झालं.

अंजलीला काय वाटेल? तिचा मी विचारच केला नव्हता. अग्नीला साक्ष ठेऊन सात फेऱ्या मारल्या होत्या आम्ही. आई-बाबांपासून आजीपर्यंत सगळ्या थोरा-मोठ्यांना नमस्कार केला होता. आताच आमच्या लग्नाला पंचवीस पूर्ण होऊन सव्वीसावं वर्ष लागलं होतं. मुलांनी अगदी धूमधडाक्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. आमचे अमेरिकन मित्र अगदी अभिमानाने सगळ्यांना सांगत होते “What a couple!” अंजलीच्या आईचा तर डोंबिवलीहून अगदी आर्जवाचा फोनही आला होतं, “दृष्ट नको लागू देऊ गं तुमच्या गोड संसाराला!” असा त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिला होता. आणि ह्या अंजलीच्या घरात ही बया अशीच मध्ये उभी! माझं आता कसं होणार? माझ्या संसाराचं कसं होणार? मी काय करू? ही नसती आपत्ती माझ्यावरच का?

तेव्हढ्यात दार वाजलं. माझ्या मनाचा ससा दचकला. कावरा बावरा झाला. मी आजूबाजूला बघीतलं. काहीच सुचेना. तिला मी अलगद उचललं. एवढ्या घाईत सुद्धा अंगातून विजेसारखी शिरशिरी चमकत गेली. पटकन तळघरात प्रवेश केला आणि तिला तिथेच उभं केलं. मी म्हणालो, “बाई गं, हलू नकोस. जरा सुद्धा आवाज करू नकोस. ही  माझी बायको तुला कच्ची खाईल (आणि मग मला तळून खाईल).” मी तळघरातून पटकन जिन्याने वर यायला आणि अंजलीने मला बघायला एकच गाठ पडली. मी धापा टाकत होतो. ती म्हणाली, “काय, विचार काय आहे?” माझी बोबडी वळली होती. मी ततपप करत म्हणालो, “व्यायाम करतोय. संध्याकाळी तळण आहे ना घरात. कॅलरी जाळतोय!” अंजली म्हणाली, “काय रे, विसरलास का? MMD (Maharashtra Mandal of Detroit) ची मिटिंग नाही का? तळण कसलं करतेय मी?” हुश्श, सुटलो एकदाचा! मी कसाबसा प्रसंग निभावून नेला खरा!

तिला मी तळघरातच ठेवलं लपवून. रोज मी तिच्याकडे जायचो. तिला हवं नको ते बघायचो. असंच रस्त्यावर कोणाला सोडून देता येतं का? तिची काळजी घेणं हे मला आता क्रमप्राप्तच होतं. विशेषतः अंजलीपासून तिला लपवून ठेवणं हे अतिशय आवश्यक होतं. माझ्या नशिबाने अंजली तळघरात विशेषतः फिरकत नाही हे माझ्या पथ्यावरच पडलं होतं. मला अंजलीचं आकांडतांडव नको होतं. “ही अडचण माझ्याच घरात कुठून आली, ह्या अवदशेला बाहेर काढा” असा घोषा नको होता. माझा संसार सुखाचा होणे हे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. पण तिचं काय? किती दिवस ती अशी एकटी तळघरात कोंडून घेणार? कोणाची भेट नाही. कोणाशी ओळख नाही. ती काय करणार?

शेवटी मी तिला MMDच्या कार्यक्रमाला न्यायचं ठरवलं. म्हंटलं, जरा चार चौघांच्या ओळखी झाल्या तर तिला बरं वाटेल. तशी ती कामाला वाघ! अशा कार्यक्रमात नाहीतरी मदत लागतेच. त्यातून मी आणि अंजली एवीतेवी वेगळ्या वेगळ्या कारनेच जातो. त्यामुळे हिला कार मधून लपवून न्यायला फारसा प्रॉब्लेम आला नसता. हिला बघून इतरांना काय वाटेल असा एक मनात विचार आला होता. पण ती एव्हढी मनमिळावू! कोणाही बरोबर कामाला लागते असं तिनेच मला सांगितलं होतं. तेही तिच्याकडून आनंदाने काम करून घेतील. “वा गुरु” ह्या जबरदस्त नाटकाचा प्रयोग गुढी पाडव्याच्या निमित्ताने MMD तर्फे सादर केला जाणार होता. सकाळी आठ वाजल्यापासून झाडून सगळी कमिटी कामाला लागणार होती. तेंव्हा म्हटलं, तिला घेऊन जाऊ या.

तो दिवस आला. अंजली आधीच निघून गेली होती. मी शांतपणे तळघरात गेलो. मी तिला विचारलं. तशी ती एका पायावर उडी मारून तयार झाली. बऱ्याच गोष्टी मला घेऊन जायच्या होत्याच. त्या सगळ्या गोष्टी पण तिने पटकन कारमध्ये नेऊन ठेवल्या. आम्ही जेंव्हा Seaholm Highschool ला (जिथे कार्यक्रम होता) पोहोचलो, तेंव्हा ह्या तरुणीला बघून बरेच पुरुष निर्लज्जासारखे धावत आले. तिला हात देऊन कारमधून त्यांनी उतरवायचा प्रयत्न केला. माझ्याकडे बघून त्यांनी असा आव आणला की जणू काही ते मलाच मदत करताहेत. जनाची नाही तर मनाची तरी त्यांना लाज हवी! एक कौस्तुभ सोडला तर बाकी सगळ्यांची तर लग्नसुद्धा झालेली होती. काही जणांना मुलं सुद्धा होती. पण शेवटी पुरुषांची जातच…. ती सुद्धा शहाणी! गेली कौस्तुभचा हात धरून तुरुतुरु चालत. माझ्याकडे ढुंकून सुद्धा न बघता! मला मात्र विचित्र वाटत होतं. परत मनाची द्विधा अवस्था झाली होती. एका बाजूला वाटत होत, गेली एकदाची अवदसा. आता घरात लपवालपवी करायला लागणार नाही. छाती फुगवून स्वतःच्या बायकोच्या डोळ्याला डोळा भिडवता येईल. पण ही अशी मला पाठ दाखवून गेल्यामुळे माझ्यातला पुरुष सुद्धा दुखावला गेला होता. ठीक आहे, माझ्या डोक्यावर टक्कल आहे, पोट सुटलेलं आहे. पुढचा दात पडलेला आहे. पण मी प्रेमळ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात मी तिला मदत केली आहे. त्याचं तिला काहीच सोयरसुतक नव्हतं. शेवटी बायकांची जातच…

संपूर्ण दिवस तिने माझ्याकडे ढुंकूनही बघीतलं नाही. मला ती दिसलीच नाही. मी भयानक अस्वस्थ होतो. प्रभावळकरांचं एव्हढं powerful नाटक. पण माझं त्याच्याकडे लक्ष लागेना. सारखं डोक्यात मुकेशचंच गाणं!

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे!
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा घर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए!!
अभी तुमको मेरी जरुरत नहीं, बहोत चाहने वाले मिल जायेगे….

खरं म्हणजे प्रभावळकर आणि मुकेश ह्यांच्या चेहऱ्यात काहीच सारखेपणा नाही. पण तिकडे स्टेजवर Neuron Motor Disease झालेला मुकेशच खुर्चीवर बसला आहे असं मला दिसायला लागलं. धाप टाकत टाकत मुकेशचं गाणं चालूच होतं.

नाटक संपलं. कमिटीने पटापट सगळं आवरायला घेतलं. ही सगळी माणसं कहर आहेत. एकदा प्रोग्रॅम संपला की इकडचा डोंगर तिकडे करायला ह्यांना पाच मिनिटं सुद्धा लागत नाहीत. अगदी स्टेजवरच्या गोष्टींपासून ते स्वैपाकघरातल्या गोष्टींपर्यंत. सगळं आवरून मंडळी आपापल्या घरी जायला सुद्धा निघाली. पण माझ्या पोटात मात्र गोळा आला! मला काही ती दिसेना. किरण आणि जयदीपला घेऊन मी अख्ख्या शाळेत तिला शोधत हिंडलो. शाळेत स्वच्छता करणाऱ्या सगळ्या बायाबापड्यांना वेड्यासारखं विचारत सुटलो. ही काही आमच्या डोंबिवलीतल्या शाळेसारखी छटाक भर शाळा नव्हती. त्या शाळेच्या अंधाऱ्या, लांबलचक corridor मधून माझे डोळे जेंव्हा तिचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होते तेंव्हा मला कारण नसताना “बीस साल बाद” मधल्या त्या गूढ डोळ्यांची आठवण यायला लागली. शेवटी अतिशय जड मनाने मी घरी निघालो. कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडल्यामुळे घरी जाऊन बरीच मंडळी आनंदात दारू पीत होते. मी माझ्या घरी दुःखात दारू पीत होतो. डोळ्यात पाणी तरळले. तिच्या आठवणीने की जरा जास्तच घेतल्याने… कुणास ठाऊक. पण मनात मात्र काळे ढग साचले होते हे नक्की. डोळ्यासमोर ती तरळत होती आणि कानात मुकेशचं गाणं चालू होतं. “कोई शर्त होती नहीं प्यारमें…” रात्रभर तळमळत होतो. अंजलीने रात्री दोन वाजता मला विचारलं, “तुला झोप का येत नाही आहे? तुझं काय चाललंय?” मी बापडा काय सांगणार. म्हणालो, “अगं, नाटकासाठी खूप काम केल्याने आता पाय दुखताहेत. ही MMD वेड्यासारखी वाढते आहे. आता पन्नाशीनंतर मला हे झेपत नाहीय.” पण डोळ्यासमोर तीच दिसत होती… तोच काळा ड्रेस आणि पिवळा चुणीदार. हाय………काय करू, काय करू!!!

दुसऱ्या दिवशी मी मनोजला फोन केला. त्याला त्या शाळेतल्या माणसांची चांगलीच माहिती होती. त्याला म्हटलं, “मनोज, प्लीज, त्यांच्याशी बोल. ती बाहेर अशीच निर्वासितासारखी राहू नाही शकणार. त्यांना शोध घ्यायला सांग. मिशिगन मधली हवा काय बेकार असते. तिचं काय होईल?” मनात अगदी काहूर माजलं होतं. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मी तिच्या वागणुकीने दुखावलो गेलो होतो. ती कौस्तुभ बरोबर टणाटणा उड्या मारत होती. आणि मी मात्र त्या भरल्या सभागृहात मनातल्या मनात मुकेशचं गाणं गात होतो. आज मात्र त्या दुःखापेक्षा, मत्सरापेक्षा मला काळजीनेच व्यापून टाकलं होतं. पण… पण एव्हढं होऊन सुद्धा माझ्या सरळ मनात चुकूनही असा विचार आला नाही की ती दुसऱ्याचाच हात धरून निघून गेली असेल. कसं असतं मनाचं नाही? जेंव्हा वस्तुस्थिती आपल्याला अनुकूल नसते, तेंव्हा आपण किती सहजपणे सत्याकडे दुर्लक्ष करतो. चालायचंच.मनोजने त्याच्या परीने प्रयत्न केले असतीलही. पण शेवटी ती काही सापडली नाही. पोलिसांकडे तक्रार नाही का करायची असं कदाचित वाचणाऱ्याच्या मनात येईल. पण मी मूर्ख नव्हतो. पोलीस येणार, चौकश्या करणार, ते अंजलीला कळणार, आणि मग मीच रस्त्यावर येऊन मिशिगनभर मुकेशची गाणी म्हणत हिंडणार. हा असा धोंडा स्वतःच्याच पायावर कोणी पाडून घ्यायला सांगितला आहे?

असेच काही दिवस गेले. मनावरचे घाव हळू हळू भरून यायला लागले. रोजच्या ऑफिसच्या रगाड्यात आणि MMDच्या हमालीत तिच्या आठवणी कमी व्हायला लागल्या. तिचा पिवळा चुणीदार वाऱ्याच्या झुळुकीने आकाशात उडाला आहे आणि तरंगत तरंगत येऊन माझ्या चेहऱ्याला, माझ्या शरीराला त्याने लपेटून घेतलं आहे असं गुलाबी स्वप्न मला पहाटे कधीकधी पडायचं. मग मी सुरेश भटांच्या गझला गायला लागायचो. “हल्ली तू रात्री झोपेत तुझ्या भसाड्या आवाजात जरा जास्तच बडबड करतोस” असं अंजली मला तेंव्हा म्हणायची. पण असे प्रसंगही आता कमी व्हायला लागले. पिवळ्या चुणीदाराच्या आठवणी काळाच्या ओघात अस्पष्ट व्हायला लागल्या. कशी मजा आहे बघा, तुफान पावसानंतर डोंबिवलीच्या गटारात कसं चांगलं – वाईट सगळंच वाहून जातं, काळाच्या ओघाचंही तसंच आहे. चांगली आठवण मनाच्या ह्या कोपऱ्यात ठेऊन देऊ या, फक्त वाईट आठवणी वाहून जाऊ देत, असा भेदाभेद काळ करत नाही. थोडक्यात काय तर माझ्या मनातून आणि संसारातून ती नाहीशी व्हायला लागली.

ह्या घटनेला आता महिना होऊन गेला. नेहमीप्रमाणे मी मंजिरी आणि राज ह्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. हे दोघे आमचे जुने शेजारी. (म्हणजे ते जुने नव्हेत. त्यांचं शेजारपण जुनं!) माझ्या पोटात दुःखाचं, निराशेचं मळभ जमायला लागलं, की मी त्यांच्याकडे खादाडीला जातो. मंजिरीच्या हातचा बटाटेवडा, दमालू किंवा साबुदाण्याची खिचडी असं काहीतरी खाल्लं, की मग माझ्या पोटातल्या निराशेचा आणि दुःखाचा कोठा एकदम साफ होतो. बटाटेवड्या बरोबर लसणाची चटणी कुठे आहे असं मी मंजिरीला विचारात असतानाच अचानक राज मला म्हणाला, “अरे, तिला घेऊन जा”. तिला? तिला म्हणजे कुणाला? अचानक माझ्या डोळ्यासमोर पिवळा चुणीदार विजेसारखा चमकला. ती माझ्या शेजाऱ्याकडे कशी? कम्बख्त दोस्त, अरे असा माझा घात का केलास? माझ्या नकळत तिला हा घेऊन आला, हळूच लपवलं आणि मान वर करून आपल्या सख्ख्या बायकोसमोर मला म्हणतो आहे की “तिला घेऊन जा”. राज तर अशा तऱ्हेने बघत होता की काही झालंच नाही. मी त्याला म्हटलं, “तुझ्याकडे?” तो म्हणाला, “नाटकानंतर माझ्या बरोबर आली. मंजिरी म्हणाली, तिला सामान घेऊन जायला वापरू. मी म्हणालो ठीक आहे.” मला राजला गदागदा हलवून विचारावंसं वाटला, “राज, तुला माहिती आहे का तू काय बोलतो आहेस?”

आणि तेव्हढ्यात मला ती दिसली. कोनाड्यातल्या अंधारात उभी होती. तशीच, जशी मला पहिल्यांदा दिसली होती तशीच. अगदी खाली मान घालून उभी होती. तशीच न बोलता, लाजरी. काळी सावळी. तोच कमनीय बांधा, तोच काळा ड्रेस, तोच पिवळा चुणीदार. ती तशीच माझ्याकडे आर्जवाने बघत होती. तिच्या डोळ्यातून मुकेश गात होता,

ज़ब अपनी नजरसेही गिरने लगो, अंधेरोंमे अपनेही घिरने लगो!
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा घर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए!!

बटाटेवडा न खाता मी तिचा हात धरला आणि माझ्या घराच्या दिशेने मी चालू लागलो.

ती…. डॉली आणि मी

नितीन अंतुरकर (मे, २०१२) 

माझी आजी

“जोड्याला जी रया आहे ती मला नाही.”

माझी आजी बाहेरच्या खोलीतून तीच्या खड्या आवाजात श्रावणातल्या ढगासारखी गरजत होती. ते ऐकून बाबा आतल्या खोलीतून तावातावाने बाहेर आले. आणि मग मायलेकांमधले प्रेमसंवाद सुरू झाले. 

“झाले हिचे मनाचे श्लोक सुरू. एवढं वय झालंय तरी माझा छळ काही थांबवत नाही ही. काय झालं एवढं ओरडायला? मी अजून जिवंत आहे ना! करतो आहे ना तुझं सगळं!” 

बाबांच्या कडाडडेल्या विजेमुळे असेल नाहीतर त्या दोघांच्या एकमेकांवरच्या अघोरी प्रेमामुळे असेल, आजी थोडीशी निवळली. त्यातून तिला ईदच्या चांदसारखा अवचित उगवलेला इडलीवाला रस्त्याने जाताना दिसला. 

“तो इडलीवाला चालला आहे रस्त्यावरून. त्याच्याकडून दोन इडल्या घेऊन घाला गिळायला मला.”

“अगं, तुला सारखे जुलाब होतात ना? मग का सारखं अबरचबर खातेस रस्त्यावरचं? जीभेचे चोचले जरा कमी पुरवावेत म्हातारपणी.”

“माझी हाडं गेली स्मशानात, आणि हा मला शिकवायला निघालाय. पदरेला दमड्या असत्या, तर आले नसते मी तुझ्याकडे इडल्या मागायला. पण माझ्या नवर्‍याने वाजवलं दिवाळं त्याच्या धंद्यात आणि केलं मला लंकेची पार्वती. म्हणून आता मला भिका मागायला लागताहेत.”

ही अशी वाजंत्री दिवसभर वाजायची. दोघेही म्हातारे. आजी ऐंशी वर्षांची तर बाबा पन्नाशीच्या पुढे पोहोचलेले. पण हे दोघे कायम ए़कमेकांवर सरकलेले असायचे.

 तशी ऐंशी वर्षांची होऊनही आजी आमची ठणठणीत होती आत्तापर्यंत. रक्तदाब नाही. मधुमेह नाही. हॉस्पिटलची पायरी चढायचा प्रसंग हिच्यावर कधी उगवलाच नाही. सगळी पंचेंद्रिय एकदम शाबूत. वळवळणारी जीभ. सकाळ-संध्याकाळ रोज ताटात डावं-उजवं तर लागायचंच. पण रस्त्यावरचा इडलीवाला, भेळवाला ह्या सगळ्या मित्रांकडून फराळ पण हवा असायचा. डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा. पण त्यातून नजर मात्र भेदक. बाहेरच्या खोलीतूनसुद्धा स्वैपाकघरातल्या सुनेच्या सगळ्या हालचाली हिला बरोबर दिसायच्या. लख्खं उन्हासारखी स्वच्छ स्मरणशक्ती. बाल्कनीमधे बसून येणार्‍या जाणार्‍या सगळ्यांना ती हात करायची आणि सकाळी सकाळी ९:०३ ची लोकल पकडायची असूनही तिच्यासमोर हजेरी लावल्याशिवाय कोणालाही पुढे जाता यायचं नाही. तीच गत संध्याकाळची. मग सगळ्या जमवलेल्या बातम्यांवर आजीचे खास शेरे दिवसभर चालू असायचे. शेजारच्या बाळ्याने नविन ब्लॉक घेतला तर ही म्हणाली, 

“आपली उंची नाही तर शिडी लावून कशाला उंटाच्या बुडाचा मुका घ्यायला जायचं?”

थोडक्यात, माझी आजी रसरशीत आयुष्य जगत होती. अगदी हापूसच्या आंब्यासारखं. आणि त्या आंब्याचे गोड डाग आमच्या आयुष्यावर सगळीकडे पडले होते… न धुतले जाणारे, अगदी कायमचे. 

मी आयआयटीमधून शनिवारी घरी आलो की ती गोड गोड हसायची. तीच्या गालाला ह्या वयातही खळी पडायची, आणि मला रात्री दहा वाजतासुद्धा पहिल्या पावसाची धुतलेली सकाळ आठवायची. तीच्या मांडीवर डोकं ठेवलं की तिचा थरथरता हात ती माझ्या डोक्यातून फिरवायची. मग मी तिच्या सुरकुतलेल्या हाताची शीर खेचत बसायचो आणि म्हणायचो, 

“आजी थकलीस तू आता.”

आजी म्हणायची, 

“होय रे बाबा! पण तुझ्या बापाने मला टाकली नाही म्हणून मी जिवंत आहे. तो तुम्हाला घेऊन कुठे दुसरीकडे निघून गेला असता तर मी काय केलं असतं? परमेश्वराजवळ एकच मागणं आहे आता. माझा भार होऊ देऊ नकोस माझ्या मुलावर.”

“तुझ्यासारख्या टुणटुणीत बाईचा कसा भार होईल बाबांवर. आणि झाला तर झाला. तू त्यांची आई आहेस ना! तू काय कमी केलं आहेस का आम्हा सगळ्यांकरता? आम्ही सगळे मदत करू बाबांना.”

कुठेतरी पाल चुकचुकायची की ही स्वाभिमानी बाई काही तिला आपल्याला मदत करू देणार नाही. पण तेवढ्यात तीचं नेहमीचं पालुपद चालू व्हायचं. 

“तू एकुलता एक. एकदा तुझं लग्न झालं की मी माझ्या माहेरी जायला मोकळी. एखादी मुलगी पटवली असशील तर आण तीला घरी.”

“आमच्या कॉलेजात फारशा मुली नाहीत आजी. कुठून पटवणार मी मुलगी? तुझ्यासारखी एखादी सुंदर मुलगी तुला कुठे दिसली तर तूच तिला सांग माझ्याशी लग्न करायला.”

तेंव्हा तिच्या तोंडाचं बोळकं दुडूदुडू हसायचं. 

पण शेवटी अघटित घडायचं ते घडलंच. एके दिवशी तिला संडासात पॅरॅलिसिसचा ॲटॅक आला. ऊग्र वासाच्या थारोळ्यात ती गडाबडा अस्ताव्यस्त पडली. तिचे आतुर डोळे, कृश शरीर, एकच निर्जीव हात आणि वाकडं झालेलं तोंड. एव्हढ्या कर्तबगार बाईची अशी अवस्था मला बघवेना. अगदी भडभडून आलं मला. देवघरातल्या समईतलं तेल आता संपायला आलं होतं. आणि आम्हां सगळ्यांची तपश्चर्या आताशी कुठे सुरू झाली होती. 

रात्रभर तिच्या कण्हण्याचे आवाज यायचे. ना झोप ना जाग अशा विचित्र अवस्थेत बाबांची रात्र संपायची. सकाळी कधी कधी सगळे विधी पांघरूणातच झालेले असायचे नाहीतर गळणार्‍या लाळीने सगळी उशी ओली झालेली असायची. मग आजीला चहा पाजायचा, अंग पुसायचं, नविन स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, जेवायला भरवायचं… बाबांचं आयुष्य आता ह्यातच जायला लागलं. मित्रं नाहीत, नातेवाईक नाहीत, बाबांच्या आवडीचे दादा कोंडकेचे सिनेमे नाहीत. हा गोलगोल “नाच गं घुमा” बाबांचा अगदी अंत बघायला लागला. पण अशा विकलांग अवस्थेतसुद्धा दुसर्‍या कोणाला आजी जवळसुद्धा फिरकू देत नव्हती. ह्या गोल घुम्यात फक्त बाबा आणि आजीच असायचे. मी आयआयटीतून आलो की माझ्याकडे बाबा भडाभडा बोलायचे. 

“म्हातारपण फार वाईट. त्यांना हवं असतं काहीही अपेक्षा न ठेवता काळजी घेणारं कोणीतरी. रात्री दोन वाजतासुद्धा न किरकिर करता पाणी पाजणारं. आपण मात्र गुंतलेलो असतो त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रेमाच्या आठवणीत. पण अशा आठवणींच्या गोळ्या खाऊन माझ्या म्हातार्‍याच्या अंगात आता बळ येणार आहे का? त्यातून तुझ्या आजीला ठणठणीत बघायची आपली सवय. तीला अशा अवस्थेत बघवत नाही आणि करवतही नाही.”

मी आजीला म्हणायचो, 

“काय गं आजी? बाबा काय कुठे पळून जाताहेत का? तू आमची मदत घ्यायला हवीस कधी कधी. आम्हाला खूप वाटतं तुझं करावसं. तुल आठवतयं का की मी शाळेतून यायच्या आत तू कसा माझ्यासाठी गोड शिरा बनवून ठेवायचीस ते! बाबांच्या नकळत जीरागोळी खायला तुझ्या तांदूळाच्या डब्यातून दहा पैसे द्यायचीस ते! कशी परतफेड करणार मी तुझ्या ह्या अफाट प्रेमाची?” 

मग डोळ्यांच्या कडा पुसता पुसता मी रागाने तिकडून निघून जायचो. 

मग ती तिच्या क्षीण हाताने आकाशाकडे बोट दाखवत म्हणायची, “माहेरी जायचयं.” तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचं प्रतिबिंब बाबांच्या डोळ्यात पडायचं. आजीचे अश्रू पुसता पुसता बाबांच्या डोळ्यातला एकच थेंब मात्र आजीच्या सुरकुतलेल्या गालावर वाळून जायचा. आणि मग खिडकीतून वाकून बघणारा यम हा आक्रोश बघत थबकून उभा राहायचा.. विटेवरच्या विठ्ठलासारखा. 

दोन वर्षं लागली मरणाला खिडकीतून आत यायला. ह्या आधुनिक पुंडलिकाचे प्रयत्न बघत यमासकट सगळे देव खिडकीबाहेरच वाट बघत थांबले होते. शेवटी आजीची कुडी मिटली तेंव्हा आम्हाला कळलंच नाही. ढगामागच्या चांदण्यासारखा मृत्यू अलगत आत आला आणि आजीला घेऊन गेला. बाबांचं आयुष्य अगदी सैरभैर झालं. बाबांचा घुमा नाचायचा थांबला आणि पायातलं बळ गेल्याने मटकन खालीच बसला. 

माझ्यावर तर आभाळच कोसळलं. मी तरातरा आवेगाने बाथरूममधे गेलो. दाराला कडी घातली. आणि जोरजोरात भिंतीवर डोकं आपटायला लागलो. आजी गेली ते गेलीच पण एकदाही तिने माझ्या हातून काहीच कसं करून घेतलं नाही. तिचे एव्हढे ऋण डोक्यावर घेऊन मी कसा जगणार? बाबा नेहमीच जवळ होते म्हणून काय झालं? नातवाचं म्हणून काही नातं असतं की नाही? का नाही तीने कधी माझी मदत मागीतली? माझा आवेग काही थांबत नव्हता. हा धडाधडा आवाज ऐकून सगळे जमलेले नातेवाईक धावत आले. सगळ्यांनी जोरजोरात हाका मारायला सुरूवात केली. दारावर धडका द्यायला सुरूवात केली. माझ्या कपाळावरून रक्त वाहात होतं. डोळ्यातून अश्रू वाहात होते. माझ्या गदगदणार्‍या हुंदक्यात मला दुसरं काहीच समजत नव्हतं.

तेव्हढ्यात दार तोडून कोणीतरी आत आलं. बाबांनी मला मिठी मारली. ते म्हणाले, “अरे, आपली आजी गेली. तिचं ते वयच होतं रे बाबा! पण तू असं वेड्यासारखं काय करतोस? शांत हो. मी नाही माझं मला सांभाळलं ते” तेव्हढ्यात आईने धावत जाऊन हळद आणली आणि कपाळावरच्या जखमेवर दाबली. सगळे म्हणत होते, “फारच जीव होता नितिनचा आजीवर. दु:ख आवरेना त्याला अगदी.”  दुसरं कोणीतरी म्हणालं, “पण बरं झालं. त्याचं दु:ख आत साठून राहीलं नाही ते.” मी काहीच बोललो नाही. मुकाट्याने दुसर्‍या खोलीत जाऊन पडलो. मी ठरवलं की आजीची वाट बघायची. तिला परत भेटायचं.

आजीला जाऊन आता पाच वर्षं झाली आहेत. अजून मी आजीची वाट बघतोच आहे. मी रोज सकाळी उठतो. आरशात कपाळावरची जखम बघतो. मग आजीची आठवण येते. गोड शिरा, तिचं हसणं, तिच्याशी मारलेल्या गप्पा, इडलीवाला, तिच्याबरोबर बघितलेला दादा कोंडकेचा सोंगाड्या सिनेमा, तिच्या गालावरची खळी, तिचा थरथरता हात…. अगदी उदबत्तीच्या वासासारख्या दरवळणार्‍या आठवणी. मग आरशात मला उदबत्तीची उरलेली राख दिसते. ती राख आरशातून माझ्याकडे झेपावते. वादळातल्या धुळीच्या भोवर्‍यासारखी ही राख माझ्याभोवती गरागरा गरागरा फिरते. मग मला माझ्या जागीच आजीचा विकलांग देह दिसायला लागतो. मग मी चूळ भरता भरता तोंड वाकडं करून पाणी तोंडातून ओघळू देतो. मग स्वच्छ टॉवेलने ती गळणारी लाळ मी पुसतो. मी घोगर्‍या आवाजात म्हणतो, “आजी, कसं वाटतय तुला आता. आज ईडली खायची का भेळ?” मग वाकड्या तोंडाने, बोबड्या आवाजात आजी म्हणते, “आता काही नको बाळा. नितिन, तूच फक्त थांब माझ्यापाशी”. 

मग अचानक आरशातला आजीचा चेहरा नाहीसा होतो. मी भानावर येतो. आंघोळ करून बाहेर य्रेतो आणि मुकाट्याने ऑफिसला जातो. रोज, रोज हे असंच. मी कोणालाच सांगीतलेलं नाही आहे. माझं हे असे भास फक्त माझ्यापाशीच आहेत. छायाला, माझ्या बायकोला सुद्धा माहीत नाहीत. सगळे छायाला म्हणतात, “एव्ह्ढा अबोल नव्हता बरं का नितिन! त्याची आजी गेल्यापासून तो एव्हढा घुम्या झाला आहे”. कुणालाच हे माहीत नाही की मी आजीची वाट बघतो आहे.  

आज छाया टेन्शन मधे आहे. आज तीचं गर्भारपणाचं ऑपरेशन आहे. बाळ म्हणे सहजासहजी आईच्या पोटातून बाहेर येणार नाही आहे. ऑपरेशन करायलाच हवं. तिचे आणि माझे, दोघांचेही आई-बाबा खूप गडबडीत आहेत. आज आरशात आजी दिसत नाही आहे. राखेचं वादळ शमलं आहे. मी गोंधळलो आहे. आजी… आजी तू कुठे आहेस? 

छायाच्या बाळंतपणात एक सुंदर डोळ्यांची इवलीशी परी जन्माला आली आहे. सगळं कसं छान आहे तीचं. टपोरे डोळे. धारदार नाक. भव्य कपाळ. काळेभोर केस. सुंदर खळी…. लुळा डावा हात. वाकडं तोंड. सगळं सगळं अगदी आजीसारखं. मला आजी भेटली आहे. मला खूप खूप आनंद झाला आहे. माझ्या आजीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं मला झालं आहे. सबंध घरभर काळ्या शालीसारखा सन्नाटा पांघरलेला आहे. मधेच छायाचा एखादा हुंदका ऐकायला येत आहे. मी मात्र लळत लोंबणार्‍या आजीला कडेवर घेतलं आहे. स्वच्छ टॉवेलने तिची लाळ पुसली आहे. तिचा एकच हात हालत आहे. ती एकाच लयीत केविलवाणं, आकारहीन, अर्धवट किरकिरत आहे. आणि ह्या तानपुर्‍याच्या साथीवर मी गात आहे, 

मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटूनी आला।
झुलता झोका जावो आभाळाला, धरतीचा टिळा भाळाला॥

मला आजी भेटली आहे. आता मी मरेपर्यंत माझ्या आजीची सेवा करणार आहे. मी खूप म्हणजे खूपच आनंदात आहे. 

नितीन अंतुरकर, ऑगस्ट, २००९ 

रात्री दोनच्या सुमारास

(लडाखमधील झांस्कर नावाची नदी हिवाळ्यातले दोन महिने काही प्रमाणात गोठते. ही जी बर्फाची “चादर” नदीवर पसरते त्यावरून जाण्याच्या ट्रेकला “चद्दर ट्रेक” असे म्हणतात. मी ही ट्रेक ६ ते १६ फेब्रुवारी २०१४ ला पूर्ण केली. ह्या ट्रेकच्या निमित्ताने….)

आजकाल दाऊद एकदम भंजाळला होता. कराचीच्या आलिशान बंगल्यात आपली छाती ताणून तो राजरोसपणे वावरायचा. पण लादेनच्या हत्येनंतर त्याची जाम फाटली होती. कराचीतल्याच मोहम्मद जीना झोपडपट्टीमध्ये छोट्याश्या झोपडीतून भुयारात जायचा जिना बांधून तिथे त्याने रहायला सुरुवात केली होती. 

तरीसुद्धा मी त्याच्या मागावर होतोच. माझ्याकडे दाऊदचा मोबाइल नंबर होता. माझ्या अर्ध्या इंच लांबीच्या बारीकश्या ड्रोनने दाऊदला शोधून काढायचा आणि त्याच ड्रोनने त्याच्या मेंदूचा भुगा करायचा हा माझा प्लॅन. पण तो आता भुयारात लपल्यामुळे त्याच्या मोबाइलचा शोध लावणं फारच कठीण होऊन बसलं होतं. एकच संधी होती. तो चुकून मोबाइल वापरत बाथरूम मध्ये एक नंबर करायला घाईघाईने आला तर तिथल्या छोट्या खिडकीच्या भोकातून मला सिग्नल मिळाला असता. पण गेल्या कित्येक दिवसात दाऊद त्याचा मोबाइल घेऊन बाथरूम मध्ये कधी गेलाच नाही. 

आज कडाक्याची थंडी पडली होती. दाऊदचं जाऊ दे, मलाच सारखं एक नंबरला जावसं वाटत होतं. आणि…  आणि मला सिग्नल मिळाला. मी उत्साहात आता ड्रोनचं बटन दाबणार… 

तेव्हढ्यात मला जाग आली. 

च्यायला त्या दाऊदच्या ! साला स्वप्नात सुद्धा मी त्याला खलास करू शकत नाही. काय माझं नशीब आहे? नेहेमीचाच प्रॉब्लेम आहे हा माझा ! नेमकी नको त्या वेळी मला जाग येते. मॅरेथॉन शर्यतीत शेवटच्या दोन-तीन ढांगा राहिलेल्या असताना, एव्हरेस्ट चढताना फक्त ५-१० मीटर उरलेले असताना किंवा ओबामाशी हस्तांदोलन करायच्या दोन मिनिटे आधी मी खाडकन् जागा होतो. स्वप्नात सुद्धा माझी स्वप्न साकार होत नाहीत. श्शी…. 

अशी चिडचिड करत माझा मेंदू आपण नक्की कशामुळे जागे झालो आहोत ह्याचा विचार करायला लागला. खरं तर माझे काही महत्वाचे अवयव पूर्वीच जागे झाले होते. त्यातले एक-दोन अवयव तर अगदी घायकुतीला आले होते. पण त्यांनी एव्हढ्या वेळा ढोसून सुद्धा माझा आळशी मेंदू काही उठला नव्हता. रात्री झोपताना मेंदूच इतर सगळ्या अवयवांना म्हणाला होता, “अबे साल्यांनो, रात्री काही लागलं तर मला लगेच उठवा. एक तर एव्हढ्या कडक थंडीत तो मूर्ख नितीन आपल्याला ह्या हिमालयात घेऊन आलाय! त्यातून भर संध्याकाळी तो घटाघटा सूप पीत होता. शरीराला dehydration नको म्हणे! आता भोगा त्याची फळं!” 

ह्या बर्फाळ नदीच्या काठावर माझ्या मेंदूला रात्री किती वाजता ह्या अवयवांनी उठवलं कुणास ठाऊक? पण मेंदूला काहीच दिसेना. सगळीकडे कच्चं अंधार! मेंदूला आधी वाटलं की कदाचित मी अख्खा माझ्या मुंडीसकट स्लीपिंग बॅगमध्ये खूप आतमध्ये गेल्यामुळे असा अंधार जाणवतो आहे. एक दीर्घ श्वास घेऊन बघितलं तर गरम हवेऐवजी अगदी थंड सणसणीत कळच डोक्यात गेली. शाळेत कोणी बर्फाचा गोळा पाठीमागे शर्टाच्या आत टाकल्यावर तो हळूच पँटीत गेला की कशी कळ यायची अगदी तशी! थोडक्यात काय, तर माझा चेहरा स्लीपिंग बॅगच्या बाहेर होता आणि सगळीकडेच  सॉलिड अंधार होता. 

मी ट्रेकवर जायच्या आधी कुणीतरी मला “खास” सल्ला दिला होता की, “बाबा रे, बॅटरी स्लीपिंग बॅगेच्या जवळ ठेव. म्हणजे अंधारात जाग आली तरी गोष्टी पटकन सापडतील”. हाहाहा, मूर्ख साला, इतर गोष्टी सापडायच्या आधी मुळात बॅटरी सापडली पाहिजे ना!  त्यातून टेंटमध्ये एकदा तुम्ही झोपलात की डिस्नेच्या सिनेमातल्या सारख्या सगळ्या निर्जीव गोष्टी भांगडा करत इकडे तिकडे नाचायला लागतात. कानटोपी स्लीपिंग बॅगच्या तळाशी सापडते. एक हातमोजा गळ्यात तर दुसरा पँटीत जाऊन बसतो. तशी ही डोक्यावर अडकवण्याची बॅटरी कुठे गेली असेल कुणास ठाऊक? 

तेव्हढ्यात एकदाची बॅटरी सापडली. हातमोजा मला हाताला कडक वाटला तेंव्हा कळलं की त्याच्या आत बॅटरी आहे. झोपताना अगद्दी “आठवणीने” मी ती ठेवली होती. मी मोठ्ठा सुटकेचा निःश्वास सोडला. मग त्या बॅटरीच्या दोन्ही बाजूची elastic शोधत मी ती बॅटरी डोक्याला लावायला सुरुवात केली. 

पण त्याआधी मला ह्या तीन तीन स्लीपिंग बॅग मधून बाहेर येणं महत्वाचं होतं. भर हिवाळ्यात १४ हजार फुटावर हिमालयात येण्याचा आम्हाला किडा होता. आमच्या ट्रेकच्या आयोजकांनी सियाचिन ग्लेशियरवर सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या जुन्या स्लीपिंग बॅग आम्हाला दिल्या होत्या. आमची छाती गर्वाने फुलली होती. इतरही अवयव “फुलले” होते. ​ह्या चांगल्या स्लीपिंग बॅगना चेनच्या आतल्या बाजूला एक लोकरी झापड होती. त्यामुळे म्हणे चेनमधून गारठा आत येत नाही. मी घाईघाईत बाहेरच्या स्लीपिंग बॅगची चेन ओढायला गेलो आणि तेव्हढ्यात चेनमध्ये ती झापड अडकली. चेन पुढेही जाईना आणि मागेही जाईना. त्या अंधुक प्रकाशात नक्की काय झालंय तेही कळत नव्हतं. माझ्या अवयवांच्या धुसफ़ुसण्याचं आता आरडयाओरडयात रुपांतर झालं होतं. एव्हढ्या रात्री वेदनेने माझ्या मेंदूला आईची अगदी कळवळून आठवण आली…. माझ्या आईची नव्हे, त्या स्लीपिंग बॅग बनवणाऱ्याच्या आईची ! 

​तीन तीन स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडून, हातमोजे, पायमोजे घालून उठून बसलो तर माझं डोकं टेंटच्या आतल्या बाजूच्या छताला लागलं. आतमध्ये चक्क झरझर बर्फ पडायला लागला. नाही, नाही, टेंटच्या छताला भोक पडलेलं नव्हतं. माझ्या श्वासोच्छवासातलं ​बाष्प टेंटच्या आतमध्ये साठून त्याचा बर्फ झालेला होता. काय काय विचित्र गोष्टी अनुभवायला मिळणार होत्या कुणास ठाऊक? आता फक्त शम्मी कपूर आणि सायरा बानू टेंटमध्ये येऊन माझ्या भोवती गरागरा गोल फिरत “चाहे कोई मुझे जंगली कहे” गायचे बाकी उरले होते. 

हा, हा, हा, आता फक्त बूट घातले की झा….लं! बाकीची अवयव सोडा, आता मेंदूच खूप आतुर झालेला होता. मुळात हे बूट साधे नाडीवाले नव्हते. तसे बूट पटकन् घालता आले असते. (निरनिराळ्या नाड्यांमुळे माणसाचा स्वःताच्या आयुष्यावर कंट्रोल येतो असं माझं प्रामाणिक मत आहे. पण ते जाऊ दे.) ह्या गोठलेल्या नदीवरून चालताना नाडीवाल्या बुटात पाणी आत जाऊ शकलं असतं. त्यामुळे आम्ही आतून लोकरीचा थर असलेले रबराचे गमबूट घालून ह्या ट्रेक वर निघालो होतो. हे गमबूट एव्हढा “गम” देतील ह्याची मला काय ​कल्पना? 

गमबूट घालायची एक पद्धत असते. पहिलं म्हणजे ताडासनासारखं एका पायावर उभं राहायचं. रशियन बॅले नर्तिकेसारखं आकाशात तरंगत असलेल्या पायाच्या घोट्याखालचा भाग एकदम टोकदार करायचा. मग खाली वाकून दोन हातांनी बुटाचं भोक मोठं करायचं. ह्या संपूर्ण प्रोसेस मध्ये तुम्ही एका पायावरच उभे, बरं का? मग चपळाईने आकाशात तरंगत असलेल्या पायाचं टोक बुटात घुसवायचं. ते बुटाच्या तळाशी गेलं की त्याला पटकन नव्वद अंशात वळवायचं. मग स्वतःचं १०० किलो वजन वापरून टाच खाली ढकलायची. कधी कधी तुम्ही “आतुर” झालेले असाल तर टोक बुटाच्या अगदी तळात जायच्या आधीच ते वळवता. मग टाच दाबली की बुटात पाय चपखलपणे बसायच्या ऐवजी बूटच वेडावाकडा होतो. त्यातून माझ्यासारखे काही पामर ताडासनात निष्णात नसतील तर त्यांना एका हाताने कशाचा तरी आधार घ्यायला लागतो ते वेगळंच. 

आता माझ्या परिस्थितीचा विचार करा. रात्री दोनच्या सुमारास अंधारात मी लहान बाळासारखा रांगत टेंटच्या बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. अमेरिकन बाळासारखा डायपर किंवा भारतीय बाळासारखं “स्वातंत्र्य” मला उपलब्ध नाही आहे. आता सगळेच अवयव आतुर झालेले आहेत. बाहेर तपमान -१५ C आहे. तुफान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टेंट डूगुडूगु हालतो आहे. आजूबाजूला बर्फ आणि टोकेरी दगडांचा खच पडलेला आहे. शेजारीच गोठलेल्या बर्फाखालून हिमालयातली भली मोठी अक्राळविक्राळ नदी खळखळा वाहाते आहे. बॅटरीचं elastic तुटल्यामुळे कावळ्यासारखी वाकडी मान करून त्या अंधुक प्रकाशात मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा परीस्थितीत दोन पायांवर उभं रहाणं कठीण! एका पायावर मी कसा उभा राहू? 

त्यातून तो जमिनीवर ठेवायचा एक पाय ठेऊ कुठे? अजून त्या पायात बूट घातलेला नाही. सगळीकडे बर्फ आणि टोकेरी दगड. शेवटी एका बुटावरच पाय ठेऊन मी कसाबसा उभा राहिलो. दुसरा प्रश्न. आता उभं राहायला आधार कशाचा घेऊ? टेंट वाऱ्यात एव्हढा गदागदा हालत होता की त्याला धरलं असतं आणि त्यात तो टेंट पडला असता तर? कुठल्याच ​अवयवाला परत कधीही घायकुतीला यायला लागलं ​नसतं पृथ्वीवर! मग हा सगळा ड्रामा स्वर्गात सुरु झाला असता. त्यामुळे मी टेंटला ​धरायचं टाळलं आणि मग तोल जाऊ नये म्हणून एकाच पायावर मी तिथल्यातिथे ​नाचायला लागलो.. पिसारा नसलेल्या मोरासारखा.. लांडोरीशिवाय! (अख्ख्या पाचशे मैलाच्या परिसरात लांडोर जाऊ दे, लांडोरीचं पिससुद्धा अस्तित्वात नसेल.) असा नाच चालू असताना, तो पाय वाकवून दुसरा पाय टोकदार करून खाली वाकून दोन्ही हाताने मी बूट उघडला आणि पटकन तरंगणारा पाय बुटात रोवला. पण टाच काही आत जाईना! आता मोर नाहीसा होऊन माझीच “नाच गं घुमा, नाचू मी कशी” अशी अवस्था झालेली होती. लांडोर नव्हती. पण लांडोरीची मंगळागौर सुरु झालेली होती. तो बूट तसाच वेडावाकडा मुरगळलेला राहिला. बऱ्याच प्रयत्नांनी दुसरा बूट मात्र व्यवस्थित घातला गेला. 

आता एक नवीनच प्रश्न मेंदूच्या समोर उभा राहिला. कॅम्प पासून एव्हढं लांब कशाला जायला हवं? होल वावर इज आवर! पण मग मला सकाळी लीडर बरोबर झालेल्या संवादाची आठवण झाली. मी त्याला विचारलं होतं, “काय रे मिलिंद, रात्री एक नंबरला लागली तर काय करायचं?” त्याने मलाच उलटं विचारलं, “अरे, तू पी बॉटल नाही आणलीस?” पी बाटली? एकदम मोरारजी भाई? हे काय लफडं आहे? त्याने समजावलं, “अरे रात्री टेंटच्या बाहेर जाणं हा मूर्खपणा आहे. टेंटच्या आतमध्ये बाटलीतच एक नंबर करायची आणि बाटलीला टाईट झाकण लावून स्लीपिंग बॅगच्या आत ठेवायची म्हणजे त्याचा बर्फ होत नाही आणि सकाळी बाटली विसळून परत वापरता येते.” शी …. ही कल्पनाच काय भयंकर होती. एक नंबर शरीराच्या आत असणं वेगळं आणि त्या गोष्टीला स्लीपिंग बॅगमध्ये कवटाळून झोपणं वेगळं! श्शी…। त्यातून एक नंबर पूर्ण व्हायच्या आधीच बाटली भरली तर? किंवा झाकण पुरेसं टाईट नसलं तर? अंगावर अक्षरशः काटा आला. माझ्या एकंदर अविर्भावाकडे बघून तो म्हणाला, “तुला पी बॉटल वापरायची नसेल तर नको वापरू, पण मग कॅम्प पासून लांब जायला लागेल किंवा टॉयलेट टेंट मध्ये जायला लागेल.” 

टॉयलेट टेंट! मुळात तो कॅम्प पासून लांब लावलेला होता. त्यातून त्या टेंट मधली खुर्ची ​डोळ्यासमोर तरंगायला लागली, आणि परत एकदा अंगावर शिरशिरी आली. ह्या लोखंडाच्या जाळीदार खुर्चीला मध्ये एक छोटंसं भोक होतं. एव्हढ्या थंडीत त्या लोखंडाच्या खुर्चीत बसण्यापेक्षा विजेच्या खुर्चीत बसून प्राण दिलेला बरा. त्याशिवाय ह्या घाईत रात्री दोनच्या सुमारास ते भोक अचूकपणे शोधणं आणि त्यावर बसणं हे द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने अचूकपणे माशाचा डोळा फोडण्यापेक्षाही कठीण! कॅम्प पासून लांब जाण्याखेरीज काही पर्याय आता उरलेला नव्हता. 

अशक्य! अशक्य होतं, एव्हढ्या लांब जाणं अशक्य होतं. वाटेत चड्डीतच झाली तर? त्या सगळ्याचा दोन मिनिटात बर्फ झाला असता. त्यापेक्षा किडनी मधला खडा परवडला असता. एका पायातला तो वेडावाकडा बूट फरपटत नेऊन नेऊन मी किती लांब नेणार? सगळंच अनावर झालं होतं. लीडर गेला मसणात! तो एक तर झोपलेला तरी असेल किंवा पी बॉटल वापरत तरी असेल. म्हणजे तो टेंटच्या बाहेर येणार नाही हे नक्की! जास्त विचार न करता मी माझ्या टेंटच्या जवळच “ओम भुर्भव स्वाहाः” करायचं ठरवलं. आता हे शिखर सर करायला ५-१० मिटरच उरले होते. मॅरेथॉन शर्यत संपत आली होती 

​नेमका अशाच वेळी मेंदू गाफील होतो. त्याचा त्याच्या अनुयायांवर काहीही ताबा राहात नाही. तो विचार करतो की आता काय, काम झालंच. घोडा मैदान आलंच. तो विसरतो की नितीनने ह्या थंडीत चार चार पँटी घातल्या आहेत. बाहेरच्या दोन पँटीना पोस्ट ऑफिस आहे. (साध्या सरळ चेनला हा असला शब्द कुठल्या गाढवाने शोधून काढला आहे कुणास ठाऊक? पण ते आत्ता जाऊ दे!). पण माझा मेंदू किंचाळला, “पण आतल्या दोन्ही पँटीना पोस्ट ऑफिस नाही.” मी सांगायचा प्रयत्न केला की “बाबा रे, पोस्ट ऑफिस असलेली आतली चड्डी अजून जन्माला यायची आहे.” एखाद्या एव्हरेस्ट वीराने अथक प्रयत्नांनी, अतिशय धैर्याने आणि कुशलतेने शिखर चढावं, आणि शेवटच्या टप्प्यात समोर एक भिंत उभी राहावी! 

पहिल्या दोन पँटीचं पोस्ट ऑफिस उघडल्यावर उरलेल्या दोन पँटीची भिंत त्या वीराने कशी सर केली ह्याची कल्पना मी वाचकांवरच सोपवतो. सगळंच काही लेखकाने सांगू नये. प्रतिभेच्या महासागरात काही डुबक्या मारण्याची जबाबदारी वाचकांचीही आहे. 

पण मी एव्हढं नक्की सांगेन की कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ होता. तुमच्या आशीर्वादाने हे कार्य सुलभतेने पार पडले. गरम पाण्यामुळे बर्फाला तडे जाऊन मी त्या खालच्या नदीत पडलो नाही. नंतर टेंटकडे परतताना आजूबाजूच्या टेंटच्या दोऱ्याना अडकून माझे गुडघे फुटले नाहीत. माझ्या टेंटमध्ये जाताना टेंट धाडकन् पडला नाही. परतल्यावर शांतपणे दाऊदला घाईची कधी लागेल आणि त्याला मी ड्रोनने कसं खलास करीन ह्याचा विचार करत करत मी झोपून गेलो. 

सकाळी उठल्या उठल्या मी लीडरला विचारलं, “मिलिंद, तुझ्याकडे एखादी एक्स्ट्रा पी बॉटल आहे का, रे?”

नितीन अंतुरकर, ऑगस्ट, २०१४

बळी दे बळी

चार वर्षाच्या माधवला घेऊन आज आया साधूराजाच्या आश्रमासमोर येऊन उभी ठाकली होती. रडून रडून माधवच्या घशाची पार फुंकणी झाली होती. गेले सात महीने तिने खूप प्रयत्न केले. गल्लीतल्या डॉक्टरला दाखवला. केईम मधल्या नर्ससमोर ती ढसाढसा रडली. महालक्ष्मीची तिने खणा-नारळाने ओटी भरली. हाजीमलंगला चादर चढवली. काळबादेवीचं व्रत केलं. पण माधवच्या पायाची जखम चिघळतच गेली होती. जखम कुजून पायाचा पार चुथडा झाला होता. पू यायचा काही थांबत नव्हता. गटाराचा वास काहीच नाही असा माधवच्या जखमेचा सगळीकडे वास मारत होता. घोंघावणार्‍या माशा हाकलता हाकलता आयाचा जीव कालवला होता.

पण आज आया शांत होती. साधूराजाच्या एकेक गोष्टी ऐकून आयाला खात्री पटली होती की साधूराजा माधवला बरा करू शकेल. पांढर्‍या बंद दारासमोर तीने उघड्या नागड्या माधवला जमिनीवर ठेवला. माधवची काळीशार बुबुळं आणि पापण्या सोडल्या तर आज आयाने माधवच्या अंगावर काळ्या रंगाचा अंशही ठेवला नव्हता. काजळ नाही, तीट नाही, साईबाबाचा नेहमीचा गळ्यातला गंडा नाही, करगोटा नाही, डोक्यावर केस नाहीत, भुवया सुध्दा नाहीत. माधव वेडावाकडा वाढलेला मांसाचा गोळा दिसत होता.

आता पांढरं दार उघडलं. सगळीकडे स्वच्छ पांढरा डोळे दिपवणारा प्रकाश पडला. चारी भिंती, खिडक्या, खिडक्यांचे पडदे सगळंच पांढरं! जमिनीवर सतरंजी सुध्दा पांढरीच, पार भिंतीपर्यंत गेलेली! कुठे रक्तरंगी फुलं नाहीत, तपकीरी नारळ नाही, पिवळी-नारिंगी फळं नाहीत आणि काळ्या उदबत्त्याही नाहीत. नक्की भिंती कुठे संपतात आणि छत कुठे सुरू होतं हेच कळत नव्हतं. अख्खी खोली म्हणजे एक पांढरा अंतरपाट वाटत होता.

अगदी खोलीच्या मधे साधूराजा मांडी घालून बसला होता. स्वच्छ धोतर आणि पांढराच अंगरखा घातलेला! कोडं आल्यामुळे असेल, पण सगळा चेहरा पांढराफटक होता साधूराजाचा! पांढर्‍या डुकरासारखी चेहर्‍याभर टच्चं बसलेली निबर कातडी. मानेपर्यंत आलेले लांब पांढरे शुभ्र केस. पांढर्‍या दाढीमिशा. त्या पांढर्‍या खोलीच्या अंतरपाटावर फक्त साधूराजाच्या डोळ्यांची बुबुळं काळी होती, आणि डाव्या डोळ्यात बुबुळाच्या बाजूने गेलेली एकच लालभडक नस आयाचं काळीज चिरून जात होती.

लांब कुठेतरी सिनेमातलं गाणं लागलं होतं.

रतिया, कारी कारी रतिया ।
रतिया, आंधियारी रतिया ॥

रात हमारी तो, चांद की सहेली है ।
कितने दिनोंके बाद, आयी वो अकेली है ॥ ….

आयाने उजळ रंगाच्या नागड्या माधवला साधूराजाच्या पायावर घातला. साधूराजाने त्याचे डोळे शांतपणे उघडले आणि त्याची माधवकडे नजर गेली… आणि साधूराजा एकदम अचानक थरथरायलाच लागला. कपाळाच्या टच्चं कातडीवर आठ्या पडल्या. नरड्याच्या शिरा ताणल्या गेल्या. डोळे गारगोट्यांसारखे मोठे झाले. काळी बुबुळं भोवर्‍यासारखी गरागरा फिरायला लागली. त्याचं संबध शरीर थडाथडा उडायला लागलं. हाताची बोटं ताठ झाली.

तो घोगर्‍या आवाजात म्हणाला,

“बळी दे बळी…”

त्याला पुढे काहीतरी म्हणायचं होतं. पण त्याचं तोंड वेडवाकडं झालं. लाळ गळायला लागली. तोंडाला पांढरा फेस आला. आचके देत तो खाली उताणा पडला. डाव्या डोळ्यातली ती लालभडक नस आता मोठी व्हायला लागली. घसा तारवटून तो किंचाळला. पण त्याच्या तोंडातून शब्दच येईना. आता ती नस फुटुन साधूराजाच्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं. तो घाबरलेला डावा डोळा थिजला आणि लपकन उघडाच राहिला. साधूराजाला अर्धांगवायुचा झटका आला होता.

आयाने जोरात बोंब मारली. माधवला पदरात घेऊन ती पटकन बाजूला झाली. माधव पण आता जोरात रडायला लागला. सगळीकडे कल्ला झाला. आयाच्या पायातले त्राणच गेले. ती मटकन खाली बसली. आजूबाजूने आश्रमातली माणसं धावत आली. “पाणी आणा, डॉक्टरला बोलवा”, एकच गलका झाला. पण साधूराजाचा देह थाडथाड उडतच होता .. नरडं कापलेल्या कोंबडीसारखा. ह्या कोलाहलात तो घाबरलेला थिजलेला डावा डोळा आयाच्या डोळ्यासमोर आला आणि माधव पदरात असूनसुध्दा ती भडाभडा ओकली.

घरी जाताना आयाच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता.

“बळी दे बळी”

साधूराजाने माझ्या माधवसाठी बोकडाचा बळी द्यायला सांगितला आहे… असंच असेल. नाहीतर माधवकडे बघून तो “बळी दे बळी” असं कशाला म्हणाला असता? आता आपल्या गावदेवीसमोर आपल्याला बोकड कापावा लागणार. गावाच्या आठवणीने तीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गेल्या २५ वर्षात तीने गावाचं नावसुध्दा काढलं नव्हतं. पण आता जुन्या आठवणींनी तीचा मेंदू कुजलेल्या कचर्‍याच्या कुंडीसारखा बरबटला. दारूड्या बापाने आयाला अकराव्या वर्षीच एका भडव्याला विकायला काढली होती. तेंव्हा गावातला एकही माईचा लाल तीच्या बापाला आडवा आला नव्हता.

आता आयुष्य नासल्यावर एवढ्या वर्षांनी परत गावाला जायचं? पण माधवसाठी हे करायलाच हवं होतं. मसणाईदेवीला बळी द्यायलाच हवा होता.

आया गावाला पोहोचली. विचकणारे जुने आणि नवीन चेहरे मटणाच्या गावजेवणाला आवर्जून आले. ज्या गावात आया अकराव्या वर्षीच नासली, त्या वेश्येच्या हातचं मटणं खायला तोच गाव तोंडातली लाळ गिळत, ओशाळ्या, ओंगळ, हावरट डोळ्यांनी आयाकडे बघत देवळात हजर झाला. ओलेत्या नवसाच्या कसायाला तीने शेंदुर फासला. लकपक बघणार्‍या बोकडासमोर नारळ फोडला. त्याला मारायला कसायाला कितीसा वेळ लागणार? एक घाव दोन तुकडे! पण नंतर बोकडाची कातडी मात्र आयाने स्वत: सोलली. घामाचा अगदी चिपचिपाट झाला. मग कोर्‍या कच्च्या मांसाचा आणि काळ्या-लाल रक्ताचा नैवेद्य मसणाईला दाखवत आयाने दोन्ही हात आकाशाकडे वळवले, आणि ती ओरडली,

“बळी घे बळी, बये, बळी घे बळी. माझ्या माधवला बरा कर गं!”

त्याच रक्ताचा टिळा तीने आधी माधवला आणि मग सगळ्या गोळा झालेल्या लोकांना लावला. भाताचा रांधा उपसण्यात, मटण शिजवण्यात आणि गावजेवण घालण्यात तिचा अख्खा दिवस गेला. विचकणारी थोबाडं हाडाच्या नळ्या चोखत, चोखत, ढेकरा देत संध्याकाळी आपापल्या घरी गेली.

त्या रात्री तिच्या स्वप्नात साधूराजा आला. तो घोगर्‍या आवाजात म्हणत होता,

“बळी दे बळी…”

त्याला अजून काहीतरी सांगायचं होतं. पण तो लुळा पडला होता. तोंडातल्या तोंडात त्याचा आवाज घोळत होता. त्या रात्री आयाचा अपशकुनाचा डावा डोळा कबुतरासारखा फडफडत राहिला.

बोकडाच्या बळीचा काहीही फायदा झाला नाही. जखम तशीच होती. तोच कुजलेला वास, तोच पू, त्याच मलमाच्या पट्ट्या, त्याच वेदना …सगळं कसं अगदी अटळ ध्रुवतार्‍यासारखं! पण आया खमकी होती. मोठ्या जोमाने तीने माधवला वाढवला. जगापासून सांभाळला. हेटाळणी, शिव्याशाप, जखमेच्या वासाएवढीच कुजकट बोलणी ह्या सगळयांपासून आपल्या पदराखाली झाकला. माधव गुरासारखा वाढला. तो वीशीच्या पुढे गेला.

पण आज शेवटी ह्या जखमेसमोर, माधवसमोर, ह्या कठोर जगासमॉर आया हरली. हालअपेष्टांमधे कसेतरी दिवस ढकलून शेवटी थकली. भकाभका रक्त ओकून तिने मान टाकली. तिचा दुधासारखा शुभ्र आत्मा तिच्या जराजर्जर छातीच्या सापळ्यातून बाहेर पडला.         

माधव धाय मोकलून ढसाढसा रडला. आयाचा हात आपल्या हातात घेऊन हुंदके देत तो म्हणाला,

“आया, होईल बरा तुझा माधव. मुक्त होईन मी घाणीतून. घेईन आकाशात झेप आणि होऊन दाखवीन कोणीतरी तुला.”

आयाने डोळे मिटले. पांढर्‍या साधूराजाकडे ती निघाली होती.

घोगर्‍या आवाजात परत साधूराजा सांगायला लागला,

“बळी दे बळी…”

साधूराजाचा फुटका डावा डोळा परत एकदा काही सांगायच्या आधीच थिजला. आता बोकडानंतर आयाचा बळी घेऊनही माधवची कुजलेली घाण जखम तशीच मागे राहीली… अटळ ध्रुवासारखी.

आयाची आठवण काढून माधवने हंबरडा फोडला. मुंबईच्या कुंटणखान्यात तीचं सगळं आयुष्य चिखलातल्या कमळासारखं गेलं होतं. अशाच वाटेवरच्या पुरुषाकडून तीला मूल झालं आणि ह्या चिखलात तीने माधवाच्या नावाने श्रीकृष्णाची पूजा बांधली. आया माधवला नेहमी सांगायची, “माधवा, देह काय, आज आहे, उद्या नाही. पण मन कमळासारखं स्वच्छ पाहिजे. मग ह्या गटारगंगेतसुध्दा श्रीकृष्णाचं मंदीर बांधू शकशील तू!”  पण आज मंदीर बांधायचं अर्धवटच राहिलं होतं आणि श्रीकृष्णाला पाठ दाखवून आया निघून गेली होती.

पण माधव आयाला दिलेलं वचन विसरू शकत नव्हता. जखम बरी व्हायलाच हवी होती. सावलीसारखा अंगाला चिकटलेला घाण वास जायलाच हवा होता. बर्‍याच दिवसांनंतर शेवटी माधवाला एक उपाय सापडला. कुणीतरी त्याला लाल विवरासंबंधी सांगितलं.

माधव निघाला. गल्लीतल्या लुत भरलेल्या लंगड्या कुत्र्यासारखा खुरडत खुरडत माधव निघाला. हा सगळा चंद्राळलेला ज्वालामुखीचा डोंगर ओलांडून लाल विवरापाशी त्याला जायचं होतं. त्या लाल विवराच्या तळाशी एक गंधकाच्या पाण्याचा तलाव असतो. त्यात डुबकी मारली की माधवची जखम म्हणे बरी होणार होती. तशी खुरडत खुरडत चालायची त्याला लहानपणापासूनच सवय होती. पण तरीही ह्या डोंगरावर उजवा पाय पटपट खेचायची त्याची धडपड जरा विचित्रच दिसत होती. चपलेने मारूनही न मेलेल्या झुरळाच्या हालचालीतल्या अगतिकेसारखी.

माधव तसा झुरळासारखाच फाटका मनुष्य. जेमतेम अंगकाठी. बेडकासारखे खोबणीच्या बाहेर आलेले डोळे. त्यातून ओसंडून वाहणारी लाचार वेदना. ऐन विशीतही केस मागे सरल्याने कारण नसताना मोठं दिसणारं चपटं कपाळ. त्यावरच्या आडव्या उभ्या आठ्या. खपाटीला गेलेले गाल आणि दाढीचे खुंट. चेहर्‍याच्या बऱोबर मधे अगदी फतकल मारून बसलेलं चपटं नाक. डाव्या नाकपुडीतून वरच्या फाटलेल्या ओठांपर्यंत गेलेली जुनी दगडावर आपटल्याची खूण. लांबून ती ओघळणार्‍या शेमडासारखी दिसे. त्या जाड्याभरड्या ओठातून बाहेर आलेले पांढरे स्वच्छ दात. सुंदर, सोज्वळ आयाच्या पोटी जन्म घेऊनसुध्दा ह्या विद्रूप चेहर्‍याचा अपशकून आपल्याच नशीबी का? नसलेल्या बेनामी बापाचं हे लेणं मलाच का? आरश्यासमोर रोज माधव ह्याचाच विचार करत असे.

पण लोकांच्या लक्षात येई तो घाण वासाचा भपकारा. माधव दहा फूटांवरून जरी गेला तरी त्याच्या आगमनाची दवंडी पिटवत हा कुजकट वास धावत पुढे येत असे. घराबाहेर पडताना अत्तर आणि फवारे मारायचा माधव किती प्रयत्न करायचा?पण त्याच्या ह्या केविलवाण्या धडपडीने त्याच्या अंगाचा वास आणखीनच विचित्र व्हायचा. चिरडून मेलेली पाल अचानक पूजेनंतर देव्हार्‍याच्या मागे सापडावी आणि तीचा कुजका भपकारा सुवासिक फुलांच्या आणि उदबत्तीच्या वासात मिसळून जावा तसं काहीसं होत असे.

आज मात्र माधवने अत्तर वगैरे काहीही फासलेलं नव्हतं. येथे कोण येणार होतं त्याला भेटायला? सकाळी सहा वाजताच लख्खं फटफटलं होतं. नीरभ्र आकाश त्याच्या आयाच्या शुभ्र पदरासारखं दिसत होतं. एवढा भलामोठा, अस्ताव्यस्त पसरलेला डोंगर! पण त्याच्यावर झाडं तर सोडाच, पण साधं गवताचं एक पातं सुध्दा नव्हतं. रखरखीत भुरकट माती. त्यातच सगळीकडे काळ्या मातीच्या ढेकळासारखे पसरलेले दगड. एखाद्या काळ्याकभिन्न आडदांड म्हातार्‍याच्या चेहर्‍यावरच्या देवीच्या व्रणांसारखे. मधेच काळ्या खडकाच्या लाटांवर लाटा. १०-१५ वर्षांपूर्वीच होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या खूणा सगळीकडेच दिसत होत्या. त्यातूनच एखादा नितळ पाण्याचा झरा! त्या देवीच्या व्रणाच्या चेहर्‍यामधून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा!

चढ जबरदस्त होता. छातीचा भाता नागासारखा फुत्कारत होता. त्यातून उजव्या पायावर जोर न देता चढायचं म्हणजे डाव्या पायात मणामणाचे गोळे येणं साहजिकच होतं. जखमेतलं रक्त, पू आणि घाम एकत्र होऊन त्याची ओली चिकट धार आता टाचेच्या खाली झिरपली होती. त्या द्रवाला बूट चिकटत होता, आणि त्याचा पचाक पचाक आवाज येत होता. पण माधवला ह्या कशाचीच फिकीर नव्हती. गंधकाच्या पाण्यातल्या आंघोळीने त्याला काशीच्या गंगेत न्हायल्याचा मोक्ष मिळणार होता. नरकातून सुटका होणार होती.

शेवटी माधव लाल विवरापाशी पोहोचला. सगळीकडे लालभडक मातीचे चित्रविचित्र आकार आणि त्याच्या तळाशी लाल भडक गंधकाचं पाणी. अक्षरशः पृथ्वीवर अशी काही जागा असेल ह्यावर आधी माधवचा विश्वासच बसला नसता. लाल मंगळावरचा एखादा जमिनीचा तुकडा कापून आणून पृथ्वीवर चिटकवला आहे की काय असं वाटत होतं. ते लाल तळं बघून माधवचा आनंद गगनात मावेना. एवढ्या आनंदाची त्याला सवय नव्हती. गदगदून हुंदके देत ठेचकाळत ठेचकाळत तो विवरात उतरायला लागला. त्याच्या डोळ्यातून एवढे भळाभळा अश्रू वाहात होते की आधीच खोबणीबाहेर आ॑लेले त्याचे डोळे त्याच्याच अश्रूत वाहात वाहात जमिनीवर पडताहेत की काय असं वाटावं. 

सगळीकडे गरम पाण्याच्या वाफेचं धुकं दाटलेलं होतं. त्यात तळ्याचा किनारा पुसटच दिसत होता. गंधकाचा घाणेरडा वास एवढा उग्र होता की त्यात जखमेचा वास येईनासा झाला. माधव पाण्यात पुढे सरकला. पाण्याच्या छान उबदार स्पर्शाने त्याला आयाच्या उबदार कुशीची आठवण झाली. आवेगाने तो अजून पुढे सरकला. नाक डोळे बंद करून त्याने पाण्यात डुबकी मारली. आपल्या आयुष्याचं सार्थक होणार असं त्याल वाटलं. आया मरतानाचे त्याचे स्वतःचे शब्द त्याला आठवले, “मुक्त होईन घाणीतून. घेईन आकाशात झेप आणि होऊन दाखवीन कोणीतरी तुला”. त्या घाण वासापासून, जखमेपासून आपली सुटका होणार ह्याची त्याला खात्री पटली. तो आवेगाने गल्लीतल्या कुत्र्यासारखा हेल काढून मोठ्याने रडायला लागला.

आणि.. आणि अचानक त्याला जाणवलं की आपले पाय चिखलात रुतले आहेत. त्याने मोठ्याने किंकाळी फोडली आणि जीवाच्या आकांताने पाय बाहेर खेचायला सुरुवात केली. पण त्याच्या ह्या केविलवाण्या प्रयत्नाने तो अजूनच जमिनीत रुतत गेला. तो जोरात ओरडला, “धावा, धावा, मला वाचवा. आया, आया,  मला वाचव गं!” पण ह्या लाल विवरात साधं वारं सुध्दा हालायला तयार नव्हतं. तो आता कमरेपर्यंत ह्या चिखलात रुतला होता. कसाबसा त्याने आपला चेहरा पाण्यावर ठेवायचा प्रयत्न चालू ठेवला. पण शेवटी साधूराजाच्या घाबरलेल्या डाव्या फुटक्या डोळ्यासारखे झालेले माधवचे डोळे तळ्यात अद्रुश्य झाले. एकच बुडबुडा आला आणि परत पाणी निश्चःल शांत झाले.

लांब पांढर्‍या बर्फाळ डोंगरातून साधूराजाचा शांत आवाज येत होता,

“बळी घे बळी.. नरबळी!”

साधूराजाला अजून पुढे काहीच सांगायचं नव्हतं! 

नितीन अंतुरकर, फेब्रूवारी, २००९

Correspondence Among Committee Members

(Correspondence is real, but all names are fictitious)


Hello,

Somebody has left or exchanged these sandals at Dr Patil’s home after our committee meeting on November 20. They are with Jayesh now. Please contact him. – Ram 

Most of you may not know what is happening. Yesterday, Narendra wore Amol’s shoes by mistake after the committee meeting and went away. Amol had to go home without shoes. Once everybody left, we finally found Narendra’s real shoes, which we took to our home.  

With this background, please read below. – Jayesh

———- Forwarded message ———-

Date: Mon, Nov 21, 2011 at 10:23 AM

Subject: Missing shoes: Terrible situation

This is Jayesh. Shoe mystery is solved. Those shoes in photograph are Narendra’s shoes. They are with me. Narendra is carrying Amol’s shoes. 

Now following development is expected in the future: 

I (Jayesh) will drop off Narendra’s shoes at Amol’ home (thinking that Narendra will approach Amol). Meanwhile, Narendra will not be knowing it. He will drop off Amol’ shoes at my home. At that time, Narendra will NOT carry extra pair of shoes. (remember, he thinks that his shoes are with us!) But by that time, since Narendra’s shoes are already gone to Amol’ home, now Narendra would have gone back to his own home shoeless (and also clueless). But Anjali is a compassionate Chairwoman of the Committee. Besides, similar to other wives, own husband is the lowest priority for her. Naturally, she happily gives Jayesh’s pair of shoes to Narendra to wear. So now, Narendra has Jayesh’ shoes, Amol has Narendra’s shoes AND Jayesh has Amol’s shoes. 

By this time, black Friday has arrived. Narendra is already feeling very very guilty that Amol is roaming around without shoes (Please note that being a gentleman that Amol is, he refuses to wear Narendra’s shoes). Knowing the announcements of all those Black Friday sales, Narendra goes to the Great Lakes Mall to buy new shoes for Amol as a Christmas gift. At the same time Amol is also realizing that life is painful without shoes. Seema (Amol’s wife) thinks that this is unnecessary extra cost. She thinks that after all, the shoes are at Jayesh’s home. She wants to minimize this expense, but still realizes that shoes are required for Amol. With this frustrating compulsion, she wakes up Amol at 1 am, gives him ginger-tea and sends him off to the Great Lakes Mall. Like all other married men, he had no choice but to listen to his wife. 

Frozen almost to death, Amol and Narendra, both rush in two separate shoe shops and buy shoes. But afterwards, while walking in the mall, they see each other. They remember seeing each other in the Committee meeting. Narendra says, “Amol?”, Amol says “Narendra?” Similar to two separated “judwa” brothers in Bollywood movies, they start hugging each other with red, teary eyes. (Never mind, that eyes are red and teary because of sleepless night on Black Friday early morning rush). Narendra gives Amol Christmas gift. Amol also feels elated with Christmas spirit and his newly found brother in the middle of the Great Lakes Mall. He gives away the new shoes that he had bought for himself to Narendra as a Christmas gift. Both continued to have red, teary eyes. 

Now both have new shoes. Narendra has given Amol a gift as per the plan. Amol had bought shoes for himself, but gave away as a gift to Narendra feeling emotional. On top of it, Narendra has Jayesh’s original shoes, Amol has Narendra’s original shoes AND Jayesh has Amol’s original shoes. Jayesh refuses to wear Amol’s shoes and is now shoeless. 

Key question for the entire Committee is: Whom do you blame for Jayesh’s pathetic situation of not having shoes? Anjali, Amol, Narendra, Seema or Jayesh himself? – Jayesh


From: Amit
Date: Mon, Nov 21, 2011 at 10:34 AM
Subject: Missing shoes: Terrible situation

Subject: Missing shoes: Terrible situation

Jayesh and other Committee members,

I am LMAO. Very very funny modern Cindrella story.  🙂

I can see the next pixar movie in the making already called “shoes” where a “boots” gets lost by it’s loving owner in the community function, then goes on whirlwind journey of self-realization while getting passed on from one well-meaning committee member to another.

Finally he finds temporary asylum in the home of King & Queen (ably played by the Committee members couple).. only to fall in love with princess’ glass slipper of a young princess in that home

And just as a budding romance will end in happily-ever-after feeling in the Bloomfield Hills in Michigan, hapless Amol find out about the missing buddy and takes him home while ripping apart the heart of glass slipper.  And now comes the reverse Cinderella story. Glass Slipper goes looking for love of her life, after looking all over during the day of thanksgiving.. missing the feast.. only to find him in the Great lakes mall at the stroke of 12.. turning into the most handsome Nike Air Jordan’s there ever was! 

Fireworks.. shoes raining from the sky and Boots and Glassy get hitched while their owners (Amol and Narendra) dance around to the Bollywood tune of “जुते दो, पैसे लो!” 🙂


LOL. Absolutely hilarious! हसून, हसून “shoe” zaali. – Giri


This is Flippin Hilarious, I agree with Giri! “Shoe” zaali.

BTW this should go in the First Entertainment program. I mean, it has to go!!!!!!

Ankush


From: Anjali
Date: Mon, Nov 21, 2011 at 10:44 PM
Subject: Re: Missing shoes: Terrible situation

Amit and Jayesh, 

Take a bow, you guys are too amazing, how about we do an improve. 

Having a rough day, but this email got to be ROFL. Such levity… priceless..  

Take care.. Anjali


This is really the most creative group I have ever met… Hats off to all of you… You guy should write a play (not necessarily on this topic but I am sure with your talent you can do justice to any subject you touch) and we could all enact it out.

Deven


Amol says, 

LOL! Great creativity! I am laughing throughout the day after reading this “developing” story and Giri’s comment (Hasun Hasun “shoe” zali). Still shoeless, I am planning to go the Great Lakes Mall on Black Friday. Hope to see “Judwa Bhai” there.

Amol (Shoewala)


Enjoy following Pune Pati on Jode kissa!!

Suneel


From: Giri
Date: Wed, Dec 7, 2011 at 3:20 PM
Subject: Just for laffs

Suggestion for the next meeting! – Giri